आमगाव : मोहगनी वृक्षलागवड करून कमी खर्चात आणि सहज सुलभतेने हेक्टरातून ५० लाखांचे उत्पादन काढणे सहज शक्य आहे. त्यासाठी ना खर्च परिश्रम करण्याची गरज आहे. त्यामुळे मोहगनी वृक्षलागवडीकडे शेतकऱ्यांनी आपला कल वाढवावा. ग्रामीण भागात ही योजना आता प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे लागवड क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न घेता येईल. मोहगनी वृक्षलागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन तामेश्वर पंधरे यांनी केले आहे.
आमगाव तालुक्यातील ग्राम करंजी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना पंधरे यांनी, मनरेगा योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्यात आले. मोहगनीचे वृक्ष दहा वर्षांत ६०-८० फुटांपर्यंत वाढ होते. त्यांची फळे, पाने व साल यांचा विविध आजारांवर व वैद्यकीय कारणांसाठी औषधांमध्ये वापर केला जातो. मोहगणी लागवडीसाठी कुठल्याही प्रकारची पाण्याची निचरा होणारी जमीन लागते. या लागवडीमध्ये ३ ते ४ वर्ष आंतरपीक घेता येते, असे सांगितले. या वृक्षारोपण कार्यक्रमात इंजिनियर तुषार बोपचे, विक्रमदित्य बोपचे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, तामेश्वर पंधरे, समर्थ लक्ष्मी ॲग्रोचे प्रतिनिधी ओमप्रकाश पटले, डालेश्वर तुरकर, योगेश चौधरी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.