उमा भारती : बिरसी विमानतळावर भाजपातर्फे स्वागतगोंदिया : ओबीसी समाजासाठी असलेल्या सवलतींपासून वंचित असलेल्या लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिले. रायपूरवरून छिंदवाडा येथे जाण्यासाठी बिरसी विमानतळावर शुक्रवारी त्या आल्या होत्या. यावेळी भाजप व लोधी समाज शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. भेरसिंग नागपुरे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि. प. सभापती छाया दसरे, न.प. गटनेता दिनेश दादरीवाल, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, दीपक कदम, जि.प. सदस्य कमलेश्वरी लिल्हारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने, महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात यावे, ज्यामुळे महाराष्ट्रातील लोधी समाजातील सुशिक्षित तरूणांना केंद्रीय नोकरभरतीत आरक्षणाचा लाभ होईल. लोधी समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला असल्याने महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये या समाजाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट केले आहे. राज्यात ज्याप्रमाणे या आरक्षणाच्या सुविधा प्राप्त आहेत, तशा केंद्रातील यादीत लोधी समाजाचे नाव नसल्याने ओबीसी आरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली. पूर्व विदर्भातील मामा तलावांसाठी केंद्राचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ज्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती, खोलीकरण होऊन स्ंिंचनाच्या सुविधा निर्माण होतील. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेदरम्यान वाहणाऱ्या वाघ नदीवर इस्टर्न वाघ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यांना शेती सिंंचनाकरिता लाभ होणार असल्याने या प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश होता.यावेळी उमा भारती यांनी, लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ठ करण्याचे आश्वासन दिले. तसेच बाघ नदीवरील प्रकल्पाकरिता दिल्ली येथील अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देवून प्रकल्पाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सिंंचन योजनेकरिता २० हजार कोटीचे बजेट असून या माध्यमातून राज्य सरकारला निधी दिला जाणार आहे. प्रकल्पाचे बळकटीकरण व पाण्याच्या लहान स्रोतांच्या विकासाकरिता सरकार कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत आपल्या क्षेत्रात भरीव कामे केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, निखारे, अग्रवाल यांच्याशी चर्चा करून जलसंधारणाची माहिती घेऊन त्यांना उपाययोजनांबाबत निर्देश दिले. यावेळी जयंत शुक्ला, भाऊराव उके, प्रदीपसिंंग ठाकूर, लक्ष्मण चुटे, राजीव ठकरेले, संजय मुरकुटे, अमित झा, सुनील केलनका, पंकज सोनवाने, अहमद मनियार, आत्माराम दसरे, रोहीत दादरीवाल, अजित मेश्राम, रामू लिल्हारे, संजय नागपुरे, उमेश बंबारे, कमलकिशोर लिल्हारे, सुरेश लिल्हारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, या अर्धा तासाच्या दौऱ्यादरम्यान भारती यांनी भाजपा, लोधी समाज संघटना व जलसंधारण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. (प्रतिनिधी)
लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट केले जाणार
By admin | Updated: February 7, 2016 02:32 IST