गोरेगाव : शासनाने प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळावे. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार सुरू केली आहे. या कामावरील मजुरांना काही मुलभूत सोयी सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.मग्रारोहयोच्या कामावरील मजुरांना प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि सावलीत विसावा घेण्याकरिता तात्पुरती झोपडीची व्यवस्था अशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी अधिकारी व कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे या कामांवरील मजुरांना उन्हाचे चटके सहन करित काम करावे लागत आहे. त्यामुळे मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून रोजगार हमी योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आला. यानंतर मनरेगा ही योजना २00७ पासून अंमलात आली. या योजनेत मजुरांच्या हितांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. मागेल त्याला काम तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरवून योजना पारदश्री ठेवण्याची तरतूद आहे. परंतु योजनेचे निकष बाजूला करुन अधिकार्यांनी मजुरांच्या अधिकारांवर गंडांतर आणल्याचे चित्र दिसून येत आहे. कित्येक ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.मग्रारोहयोच्या कामांवरील मजुरांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास प्राथमिक उपचार म्हणून औषधांची व्यवस्था करण्यात येते. मात्र कामावर प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था नसल्याचे े चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मजुरांना पिण्याकरिता आपल्या घरून पाणी घेऊन यावे लागते.यावरून प्रशासन मजुरांच्या हिताप्रती किती सजग आहे, याची प्रचिती येत आहे. या योजनेत एकंदरीत मजुर भरडून निघत आहेत. पंचायत विभाग आणि जिल्हा रोजगार हमी योजना यंत्रणेनेने याकडे त्वरित लक्ष घालून मजुरांच्या हिताकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मजुरांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
मग्रारोहयोच्या कामांवर सोयीसुविधांचा अभाव
By admin | Updated: May 10, 2014 02:26 IST