अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वत्र आता कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला आहे. सर्वच व्यवहार देखील आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वेने सुध्दा रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख स्थानक असून या स्थानकावर दररोज ४७ गाड्या ये-जा करीत असून यातून साडेचार हजारावर प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढण्यास सुरुवात झाली असून हावडा आणि मुंबई या दोन्ही मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वेकडून अजून काही गाड्यांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. लॉकडाऊनपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावरून नियमित ७५ गाड्या धावत होत्या, तर दररोज २५ हजार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र लाॅकडाऊनमुळे लोकल, पॅसेजरसह बऱ्याच रेल्वे गाड्या अद्यापही पूर्ववत सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांची प्रतीक्षा कायम आहे. रेल्वे विभागाने पँसेजर आणि लोकल गाड्या सुरु करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी.
लोकल व पॅसेजर रुळावर केव्हा रेल्वे विभागाने विशेष तसेच इतरही गाड्यांत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र लोकल आणि पॅसेजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लोकल आणि पॅसेजर गाड्या नेमक्या रुळावर केव्हा येणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
प्लॅटफाॅर्म तिकीट विक्री स्थिर
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर ५० रुपये केले होते. हे दर अद्यापही कमी केले नसल्याने प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीत वाढ झालेली नाही. तिकिटाचे दर वाढविण्यापूर्वी दररोज ४५० हून अधिक प्लॅटफार्म तिकिटांची विक्री केली जात होती. ती आता ७० ते ८० वर आली आहे.
सुरू असलेल्या रेल्वे गाड्या... - नागपूर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस- छत्तीसगड-अमृतसर एक्स्प्रेस- पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस- जबलपूर-चांदाफोर्ट- समता एक्स्प्रेस- अजमेर-पुरी एक्स्प्रेस
शहरांकडे धाव
- कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर रेल्वे गाड्यांमधील गर्दीत वाढ होऊ लागली आहे. मुंबई आणि हावडा या दोन्ही मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांत सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.- आता जवळपास सर्वच व्यवहार शिथिल होत असून रोजगारासाठी अनेकजण शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे सुध्दा रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे.