कार्लेकर : बाल कल्याण जनजागृती कार्यक्रमगोठणगाव : लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे. ज्याप्रमाणे आपण वटवृक्ष लावतो, त्यापासून फूल, फळ व सावली मिळते. रोपटे लावल्यापासून त्यांची देखरेख व निगा राखतो. त्याप्रमाणे लहान मुलांची काळजी व निगा राखावी, असे दिवाणी न्यायाधीश कार्लेकर म्हणाले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव येथील सभागृहात बालकल्याण न्यायमंडळ व बालकल्याण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी तहसीलदार बाम्बोर्डे व उद्घाटक न्यायाधीश कार्लेकर होते. अतिथी म्हणून खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, ठाणेदार नामदेव बंडगर, अॅड. कापगते, पालीवाल, बनपुरकर, जिल्हा बालकल्याण अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. न्यायाधीश कार्लेकर पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्या करतो. परंतु तो आत्महत्या का करतो? याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे संशोधन करणे गरजेचे आहे. तेव्हाच परिवर्तन घडून येऊ शकते. एवढेच नाही तर मुलांमध्ये दहशत निर्माण होऊ नये, असे कृत्य आपण करु नये, याची काळजी घेणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करण्यास सांगितले जाते. प्रोजेक्ट वेडावाकडा जरी केला तरी त्या मुलाचे आपापल्या परिने भेटवस्तू देऊन स्वागत केले पाहिजे. त्यामुळे त्या मुलाला आपोआपच दुसऱ्यांदा अधिक चांगला प्रोजेक्ट तयार करण्याची प्रवृती निर्माण होईल.मंचावरील मान्यवरांनी बालगुन्हेगारीच्या संबंधात मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, पर्यवेक्षिका, बचत गटाच्या कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक महिला व बालकल्याण अधिकारी उषा आखरे, संचालन विस्तार अधिकारी भुरे व आभार पर्यवेक्षिका सुनीता दमाहे यांनी केले. (वार्ताहर)
लहान मुलांना वटवृक्षाप्रमाणे वाढवावे
By admin | Updated: February 6, 2016 01:51 IST