तिरोडा : राज्यात फडणवीस सरकारने सुरु केलेले आपले सरकार पोर्टल हे जनतेच्या फायद्याचे ठरत असून तालुक्यातील आतापर्यंत दोन समस्यांचे निराकरण होऊन त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत, असे आमदार विजय रहांगडाले यांनी कळविले आहे. यामध्ये डोंगरगाव खडकी येथील गोवर्धन भाऊजी पटले यांचे माहे जूनपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण १२ हजार ७९६ रुपये खात्यात जमा न झाल्यामुळे पटले यांनी वारंवार संबंधित संपर्क साधला असता १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला. परंतु १५ दिवसांचे आठ महिने लोटूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे पटले यांनी आमदार रहांगडाले यांचे स्विय सहायक विवेक ढोरे यांच्याशी संपर्क साधला. तसेच संबंधित यंत्रणेला दिलेल्या कार्यालयीन पत्रावर जिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे तसेच शिफारसपत्रासह आपले सरकार या पोर्टलवर तक्रार नोंदविली. त्यावर त्वरित कार्यवाही होऊन जिल्हाधिकारी रोहयो यांच्यातर्फे आदेशीत करुन २० दिवसांच्या आत पटले यांच्या खात्यावर पगाराचा पहिला हप्ता म्हणून पाच हजार ९४ जमा करण्यात आले. तसेच दुसरा हप्ता मार्च अखेर जमा करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे मौजा गांगला येथील मग्रारोहयो अंतर्गत सन २०१५-१६ चे रस्ता बांधकामाचा निधी तीन लक्ष ३४ हजार रूपये वारंवार पत्रव्यवहार करुन सुद्धा जमा झाला नाही. यात ढोरे यांच्या मदतीने पोर्टलवर तक्रार दाखल केल्यानंतर ३५ दिवसांच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत गांगलाच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. यातून आपले सरकार पोर्टल जनतेसाठी फायद्याचे ठरत असून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन आमदार रहांगडाले यांनी केले.
सरकारच्या पोर्टलमुळे समस्या निवारणास मदत
By admin | Updated: March 18, 2017 01:57 IST