सडक अर्जुनी : सडक अर्जुनी ते रेंगेपार शेंडा रस्त्याचे अर्धवट काम झाल्यामुळे अनेक नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्या रस्त्यावर नियमित अपघात होत असल्यामुळे, या समस्याग्रस्त अर्धवट रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गोंदिया यांचे नियंत्रणात या रस्ताचे काम सुरू असून, कंत्राटदार मेसर्स अताशा आशीर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्या नावाने आहे. या बांधकामाचा कार्यारंभ आदेश १४ नोव्हेंबर, २०१८ला देण्यात आला असून, काम पूर्ण करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर, २०२० होता. बांधकामाची किमत २८ कोटी असून, आतापर्यंत फक्त २० टक्के काम झालेले आहे. ८० टक्के काम हे शिल्लक असून, सद्यस्थितीत बांधकाम बंद आहे. सडक अर्जुनी ते शेंडा रस्ता हा सडक अर्जुनी तालुक्यातील मुख्य रस्ता असून, या रस्त्यालगत जवळ १५ गावे जोडल्या गेली आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाने संपूर्ण रस्ता खोदण्यात आला आहे. अनेक ठिकाणी केवळ गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने साधे पायी चालनेही शक्य नाही. त्यामुळे अर्धवट काम कंत्राटदारांनी त्वरित पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री नवाब मलीक, खासदार प्रफुल पटेल, जिल्हाधिकारी, सचिव बांधकाम विभाग मुंबई, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम नागपूर यांना पाठविण्यात आले आहे. शिष्टमंडळात राकाँ. तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, शहर अध्यक्ष प्रियंक उजवने, महिला तालुका अध्यक्षा रजनी गिऱ्हेपुंजे, माजी नगराध्यक्ष देवचंद तरोणे, माजी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, माजी नगरसेवक दिलीप गभणे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मतीन शेख, माजी पं.स. सभापती वंदना डोंगरवार, मोहनकुमार शर्मा, ओमप्रकाश टेंभुर्णे, समीक्षा उदापुरे, सुबूर सौदागर, सारिका मसराम, दीक्षा भगत, अफरोज शेख, फारुक शेख, अतुल फुले, विनोद जगताप, के.बी.चव्हाण, सदाराम लाडे यांचा समावेश होता.