बनगाव योजनेचे ३३ लाख थकीत : पैसे न भरणाऱ्यांची यादी जाहीर करा गोंदिया : आमगाव तालुक्याच्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव तालुक्यातील २६ गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचे बील न भरल्यामुळे या २६ गावांपैकी पाच गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. ७० टक्यांपेक्षा अधिक बील थकीत असणाऱ्या पाच गावांत साखरीटोला, पदमपूर, चिरचाळबांध, खुर्शीपार व कातुर्ली या गावांचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातील २६ तर सालेकसा तालुक्यातील चार गावांना या योजनेतून पाणी पूरवठा करण्यात येतो. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींनी पाण्याच्या बिलाची वसूली न केल्यामुळे या ग्राम पंचायतींवर ३३ लाख २६ हजार ४४ रूपयांची थकबाकी आहे. यात आमगाव तालुक्यातील बोरकन्हार या ग्रामपंचायतकडे १ लाख ३८ हजार ४८० रूपये, बाम्हणी या ग्रामपंचायतवर ८८ हजार ९६० रूपये, पदमपूर १ लाख ५४ हजार ६८० रूपये, रिसामा ४ लाख ६६ हजार ७८० रूपये, बिरसी ६५ हजार ३०० रूपये, बनगाव ३ लाख ६८ हजार ८२० रूपये, किडंगीपार ९८ हजार ४६० रूपये, शिवणी एक लाख ३४ हजार, चिरचाळबांध एक लाख ९८ हजार ८५० रूपये, खुर्शीपार एक लाख ९५ हजार ४३८ रूपये, जवरी ७६ हजार ४० रूपये, मानेगाव ७४ हजार २०० रूपये, ठाणा ३१ हजार ४० रूपये, बोथली ३० हजार ५३० रूपये, सुपलीपार ३३ हजार ५२२ रूपये, किकरीपार ५० हजार ७७० रूपये, कातुर्ली २ लाख २९ हजार ८२२ रूपये, मोहगाव ७ हजार ४१० रूपये, बंजारीटोला ४८ हजार, ननसरी ३१ हजार ६०० रूपये, सरकारटोला ७८ हजार ७८० रूपये, घाटटेमणी एक लाख ३१ हजार ४३० रूपये, पानगाव ८७ हजार २२० रूपये, फुक्कीमेटा ७ हजार ४८० रूपये, आमगाव १२ हजार ६७२ रूपये तर सालेकसा तालुक्यातील साखरीटोला २ लाख १४ हजार १६० रूपये, कारूटोला १ लाख ३८ हजार ३० रूपये, सातगाव ५० हजार ६८० व हेटी ग्रामपंचायतवर १ लाख १ हजार ४६० रूपये थकीत आहेत.यातील ७० टक्यांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पाच गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर थकबाकीदारांची यादी जाहीर करा अशी मागणीही नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)चार गावे पुन्हा रडारवर७० टक्यांपेक्षा अधिक पाण्याचे बील थकीत असणाऱ्या गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. तीन दिवसांपासून पाच गावांतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला तर पुन्हा घाटटेमणी, कारूटोला, मानेगाव व बोरकन्हार या चार गावांतील पाणी २ जूनपासून बंद होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामपंचायतींनी थकीत बिलाची रक्कम न भरल्यामुळे पाणी पूरवठा बंद करण्यात आल्याचे कनिष्ठ अभियंता उत्तम शिंदे यांनी सांगितले. पाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई कधी?या योजनेंतर्गत पाणी वाटपासाठी गावागावात ठेवण्यात आलेले काही व्यक्ती गावातील लग्न समारंभात, तेरवीच्या कार्यक्रमात त्या कार्यक्रम घेणाऱ्या व्यक्तीकडून २०० ते ५०० रूपये घेऊन पाणी देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते व बिल ग्रामपंचायतचे वाढते. पाणी सोडण्याची वेळ निश्चीत असावा. केव्हाही पाणी सोडले जाते, अशा तक्रारी संबंधित योजनेच्या अभियंत्यांना देण्यात आल्या. परंतु त्यांच्याकडूनही कारवाई करण्यात आली नाही. पाणी वाटप करणारे व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी अख्या गावावर पाण्याच्या पैशांचा भूर्दंड बसवित आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.ग्रामपंचायतने नळ कनेक्शन धारकांकडून वेळीच पाण्याची वसूली करावी. नळ कनेक्शन धारकांना फक्त शंभर रूपयांत शुध्द पाण्याचा पूरवठा होतो त्यांनीही आपली जबाबदारी ओळखून पाण्याचे पैसे ग्रामपंचायतीला द्यावे. जेणेकरून योजना चालविण्यात अडचण येणार नाही. - उषाताई मेंढे जि.प. अध्यक्ष तथा जि.प.सदस्य पदमपूर.
पाच गावांचा पाणी पुरवठा ‘कट’
By admin | Updated: May 30, 2016 01:35 IST