गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत. राज्य शासनाने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील हजार तंटे सामोपचाराने सोडविण्यात आले. तंटामुक्त मोहीम आल्यापासून ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपले भांडण, तंटे गावातच सोडवितात. अनेक लोक ही मोहीम आल्यापासून पोलीस ठाणे किंवा न्यायालयाची पायरी चढत नाही. गावात शांतता नांदावी, नवीन तंटे उद्भवू नये यासाठी तंटामुक्त समिती अविरत प्रयत्न करीत आहे. तंटामुक्त समितीने प्रयत्न केल्यावरही भांडण, तंटे तर ते तंटे गावातल्या गावात सामोपचाराने सोडविले जातात. याचाच परिणाम गोंदिया जिल्हा तंटामुक्त होऊन तीन वर्षाचा काळ लोटूनही मोहीम राबविणाऱ्या समित्यांनी तंटे सोडविण्याची गती सुरूच ठेवली आहे. २०१४ च्या पाच महिन्यात दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर अशा स्वरूपाचे तंटे दाखल करून गावगाड्यातून तंट्याचा निपटारा करण्यात आला. दिवाणी स्वरूपाचे चार तंटे दाखल करून एक तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. महसूली स्वरूपाची ६ तंटे दाखल करून २ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. फौजदारी स्वरूपाची ६९६१ तंटे दाखल करून ४ हजार ६०८ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. इतर स्वरूपाचा एक तंटा दाखल करण्यात आला मात्र त्या तंट्याचा निपटारा करण्यात आला नाही. मागील पाच महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी ६ हजार ९७२ तंटे दाखल करून ४ हजार ६११ तंटे समन्वयातून सोडविण्यात आले. शांततेत तंटे सोडवून गावात शांततेतून समृध्दी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)
पाच महिन्यात समन्वयातून सुटले ४६११ तंटे
By admin | Updated: July 9, 2014 23:35 IST