गोंदिया : मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आठवड्याभरा पुर्वी स्थानिक न.प. प्रशासनाने स्वच्छता अभियान राबवून लाखो रुपये खर्च केले. परंतु पहिल्याच पावसाने गोंदिया नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल केली असल्याचे चित्र दिसून येत आहे. घाणीच्या साम्राज्यावरून शहरवासीयांत असंतोषाचे वातावरण आहे.दोन दिवसापर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील गल्लीबोळात घाण निर्माण झाली आहे. सर्वत्र नाल्यामध्ये केरकचरा तुडूंब भरल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने झालेला नाही. परिणामी सर्वत्र रस्त्यावर पाणी साचलेला दिसत आहे. एवढेच नव्हेतर रस्त्यावर घाणपाणी असल्यामुळे शहरात दुर्गंधीही पसरली आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने आठवड्याभरपूर्वी शहरात स्वच्छता अभियान राबविला. या अभियानात लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र थातूर-मातूर स्वच्छता अभियान राबविल्यामुळे पहिल्याच पावसाने अभियानाची ‘पोलखोल’ केली आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे. नगर परिषदेच्या सत्तेत काँग्रेस व राकाँ हे दोन्ही पक्ष आहेत. त् परंततु शहरात घाणीच्या साग्राज्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. न.प.चे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घाणीच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला हवे. मात्र त्यांना कर्तव्याचा विसर पडला आहे. असाही आरोप केला जात आहे. जिल्ह्यात जि.प. व पं.स.च्या निवडणुका जेव्हा होतात त्यावेळी मात्र जिल्हावासियांना आश्वासनाची खैरात वाटल्या जाते. निवडणुका संपल्या नंतर मात्र एकाही लोकप्रतिनिधीला जनतेच्या समस्यांशी काहीच देणे घेणे नसते. दरवर्षी फक्त न.प. प्रशासनाकडून विविध अभियान राबविण्यास प्रशासन सज्ज राहाते, मात्र हे अभियान तात्पुरत्या स्वरूपाचे असते. पावसाळयाच्या दिससात कावीळ, मलेरिया, डायरिया या सारखे रोग पसरत असतात. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आरोग्य विभाग परिसरात स्वच्छता संदेश देत असते.परंतु स्थानिक न.प. प्रशासनच स्वच्छतेकडे दुर्लक्षकरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. यामुळे गोरगरीब जनतेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे, डॉक्टर मात्र अस्वच्छतेपासून निर्माण होणाऱ्या रोग व रूग्णांपासून लाखो रुपयाची कमाई करीत असतात. असे यंदातरी घडू नये अशी शहरवासियांची अपेक्षा आहे.शहरातील घाणीच्या गंभीर समस्येकडे गोंदिया शहरातील लोकप्रतिनिधी व न.प. प्रशासनाकडे लक्ष घालून अस्वच्छतेपासून शहराला मुक्त करावे, अशी मागणी शहरवासी करीत आहेत. गोंदियातील सर्वच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यामुळे नगर परिषदेने डासनाशक फवारणी करावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
पहिल्याच पावसाने केली न.प.ची पोलखोल
By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST