काचेवानी : बेरडीपार येथे ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या लाभासंबंधी लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेव बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी भूवन कापसे, गणेश कोल्हटकर, गोविंद ठाकरे, मोहपत टेंभेकर, नारायण पटले, नकटू कटरे, जयप्रकाश गौतम, छगनलाल कृपाले, इम्रता पारधी व गीता कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक गटसचिव आर.एम. पटले यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध सेवा सहकारी संस्थेने सर्व सभासदांना अहवाल पुस्तिका द्यावी, अशी मागणी केली. मागील पाच वर्षांपासून शेतकरी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे. पण शासनाने हवे तसे सहकार्य केले नाही. तसेच त्याबाबत संस्थेने पाठपुरावा केल्या नसल्याचा आरोप केला. गेल्या पाच वर्षांपासून पीक विमा योजनेच्या नावावर लाखो रूपये शेतकऱ्यांपर्यंत गडप करण्यात आले. सेवा सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना लुबाडण्यापूरता दिलासा दिला. मात्र या काळात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यावरही पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही. तसेच संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले नाही. शिवाय विमा कंपनीच्या दलालीत सेवा सहकारी सोसायटी सहभागी असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यामाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा वेळेवर पुरविण्यात येत असल्या तरी यातून ते कर्जबाजारीच होत आहे. पीक विमा योजना ही फसवेगिरी करणारी योजना असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. यावेळी माजी उपसरपंच धनराज पटले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी व समस्यांवर चर्चा घडवून आणली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बिसेन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. पीक कर्ज प्रत्येक वर्षी देण्यात येते. मागणी करणाऱ्यांना वंचित करण्यात आले नाही. कर्जाची वसुली सर्व सभासदांनी वेळेच्या आत दिल्याने सवलतींचा लाभ मिळेल. तसेच पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सेवा सहकारी संस्थेने पीक विमा काढण्याच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले. ६०० सभासदांपैकी १६० सभासदांनी पीक विमा काढल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक मंडळासह गावातील ३०० शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
पीक विमा योजनेवर शेतकऱ्यांचा आक्रोश
By admin | Updated: September 20, 2014 23:53 IST