राष्ट्रवादीची टीका : आता त्यांची बोलती बंदगोंदिया : जिल्ह्यात रस्ते करा, पर्यटनाला चालना द्या, आम्ही त्याचे स्वागतच करतो, पण मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी सातत्याने शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हीच तुमचे कैवारी आहोत. उत्पादन खर्चाच्या दीड पट तुम्हाला भाव मिळालाच पाहिजे. राज्यात एक आत्महत्या जर झाली तर तत्कालीन सरकारच्या प्रमुखावर ३०२ चा गुन्हा दाखल करा, या प्रकारचा विषारी प्रचार करून राज्यात आणि केंद्रात सरकार स्थापन करणाऱ्यांना आता मात्र शेतकऱ्यांचा विसर पडला, अशी टीका जि.प. सदस्य आणि राष्ट्रवादीचे गटनेते गंगाराम परशुरामकर यांनी केली आहे.त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, जिल्ह्याच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकाकडे वळण्याचा सल्ला देऊन उत्पादन खर्चावर दीडपट आधारित भाव देण्याच्या बाबतीत बोलणेच बंद केलेत. याचा परिणाम असा झाला की राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आली असताना या एक वर्षात ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांना जयश्रीराम सारख्या धानाला २,५०० रूपयांवर भाव मिळत होता, आता तो १,८०० रूपयांना विकत नाही. हा सरकारच्या शेतकरी विरोधी नितीचा परिणाम आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी तुम्हाला माफ करणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सुमारे आठ हजार कोटी रूपयांच्या खर्चाच्या रस्ते बांधकामाच्या भूमिपूजनाला भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावर आले असताना शेतकऱ्यांना त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना पीक पध्दतीत बदल व पीकविमा यावर भाष्य करून निवडणूकपूर्व काळात केलेल्या घोषणा, दिलेली भाषणे व जाहीरनाम्यात उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे दिलेल्या आश्वासनावर त्यांनी एक शब्दही न बोलता शेतकऱ्यांच्या तोंडाला एकंदरीत पानेच पुसली. जेव्हा शेतकऱ्यांना आपण उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देवू शकत नव्हतो तर तशा प्रकारच्या पोकळ घोषणा करणे योग्य नव्हते. निवडणूकपूर्व काळात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातीलच एका नेत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घेत नाहीत म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर दुसरे एक नेते हे तर उटसुट डोक्याला फेटा बांधून राष्ट्रीय महामार्ग कोहमारा येथे शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करीत असत. पण आता कुणीही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत नाही.जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी नुकतीच सडक-अर्जुनी येथे आढावा बैठक घेतली. त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीत धानाच्या पेंढ्या आणून दाखविल्या. पोटतिडकीने व्यथा सांगितल्या तसेच चिचटोला येथील एका कार्यक्रमात त्याच प्रकारची मागणी तेथील प्रतिष्ठीत नागरिकांनी केली. पण पालकमंत्री दोन्ही कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बाबतीत एक शब्दही बोलले नाहीत, ही एक शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत तत्कालीन राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलेल्या अनेक योजना या सरकारने बंद केलेल्या आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याचा मुख्य हेतू ठेवून सुरू करण्यात आलेल्या आत्मा योजनेला (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना) यंदा निधी मिळालेला नाही. यावर्षी जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर जमिनीवर घेण्यात येणाऱ्या जयश्रीराम व एचएमटी सारख्या धानाचे उत्पादन झाले नाही तरी एकेकाळी आकांडतांडव करणारी व आता सत्तेत असलेली सर्व मंडळी गप्प आहे. गरीब लोकांच्या जेवनातील दाळ ही १५० ते २०० रूपयांनी विकली जात आहे. यावरून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. म्हणून या परिसरातील शेतकरीसुध्दा आत्महत्येकडे वळण्याची भिती परशुरामकर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
मते मागणाऱ्यांना शेतकऱ्यांचा विसर
By admin | Updated: February 3, 2016 01:58 IST