इटियाडोहचे पाणी सुटले इटखेडा : सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आल्याने प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीविषयक कामांना सुरूवात केली आहे. त्याद्वारे इटखेडा परिसरातील सुमारे ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. उन्हाळी धान पिकांच्या उत्पादनातून आता तरी कर्जमुक्ती होईल, हीच आशा त्यांची पुन्हा बळावली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना आता बांधावरील गवत कापणे, धानाच्या रोपवाटिकेसाठी नागरणी करणे, बी-बियाण्यांची जुळवाजुळव करणे आदी शेतीविषयक कामांची लगबग वाढली आहे. शेतकऱ्यांच्या शेतांना सिंचन होण्याच्या दृष्टिने येथील समृद्धी वापर संस्थेच्या अधिपत्याखालील इटखेडा, इसापूर, घाटी पळसगाव, कन्हाळगाव येथील शेतकऱ्यांना सुमारे ३०० हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचावे या दृष्टिने पाटांची डागडुजी करणे, पाणी अडू नये यासाठी पाणी वाहून जाणाऱ्या पात्रातील गवत कापणे व स्वच्छता ठेवणे आदी बाबी पाणी वापर संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे योग्य नियोजन करावे व सिंचनाच्या पाण्याचा व्यवस्थित उपयोग करावे, असे आवाहन समृद्धी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष इंद्रदास झिलपे, देविदास पालिवाल, दामोदर चांदेवार, शालिकराम हुकरे, वासुदेव लांजेवार, शालिकराम भोयर, वासुदेवराव उईके, विलास भावे, मोरेश्वर गोंडाणे, लिनता येरणे, मालन उईके, सुशीला गोंडाणे व संस्थेचे सचिव विजय मेश्राम यांनी केले आहे. (वार्ताहर)
सिंचनासाठी शेतकरी ‘आसुसला’
By admin | Updated: January 3, 2015 23:05 IST