राजकुमार बडोले : खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना गोंदिया : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आली पाहिजे, त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. कृषि विभागाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी (दि.१३) आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना बडोले यांनी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी उदासीन असल्याचे दिसून येते. या बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक ऱ्यांना दयावा. जिल्ह्यातील बहुतेक धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान आधारभूत धान खरेदी योजनेंंतर्गत खरेदी करुन त्यांना बोनसचा लाभ मिळण्यास सहकार्य करावे. धान साठवणुकीसाठी गोदाम ठरविण्याचे अधिकार लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. १ मे पासून दोन्ही एजन्सींनी धान खरेदीची तयारी पूर्ण करावी असे सांगितले. रब्बी हंगामात सिंचनाचे योग्य नियोजन करावे असे सांगितले. तसेच कृषिपंपांना वेळीच वीज जोडणी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना योग्य वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मोठ्या प्रमाणात कसे देता येईल याचे नियोजन करावे. फिडरनिहाय समित्यांचे गठण करण्यात यावे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्र ारी येणार नाहीत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्यात याव्यात. शेतक ऱ्यांचे अभ्यास दौरे काढावे असेही पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले. जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, शेतात खोलवर बोअरवेल करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने समज देवून बोअरवेल करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करावा, त्यामुळे जलसंकट निर्माण होणार नाही, असे सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी, बोअरवेलच्या मशीन जिल्ह्यातील काही भागात आल्या आहेत, त्याा मशीनवर उपविभागीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असावे. त्यांना बोअर करण्याची परवानगी देवू नये. लवकरच याबाबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. आढावा सभेला कृषि, सिंचन व संबंधित सर्व यंत्रणांचे जिल्हास्तरिय अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) २४७.२१ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात २५ हजार ३६० क्विंटल बियाण्यांची महाबीजकडून आणि १३ हजार १३४ क्विंटल बियाण्यांची खाजगीतून मागणी करण्यात आली आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, संयुक्त खते आणि मिश्र खतांची एकूण ७५ हजार मेट्रीक टनाची मागणी करण्यात आली आहे. चालू हंगामात २४७ कोटी २१ लक्ष रु पये पीक कर्ज वाटपाचे लक्ष असून यामध्ये १२६ कोटी ५० लक्ष रु पये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ४६ कोटी ५१ लक्ष ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना ७४ कोटी २० लक्ष रु पये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सिंचन प्रकल्प व इतर साधनापासून एक लक्ष २८ हजार ८८१ हेक्टर सिंचनाचे नियोजन असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा
By admin | Updated: April 15, 2017 00:53 IST