आमगाव : आमगाव तालुक्यात शासनच्या विविध योजना अंतर्गत विकास कामांना गती देण्याचे कार्य संथगतीने असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम ई-निविदा प्रकाशित होत नसल्याने बांधकामेच रखडली आहेत. तर या विकास कामांवर पुढील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींची टांगती तलवार आहे. यामुळे विकास कामांवर कर्तव्य उदासिनतेचा फटका बसणार आहे.आमगाव तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींच्या माध्यमाने विकास कामांची गती वाढावी यासाठी शासनाने विविध योजनेंतर्गत निधीचे आवंटन ग्रामपंचायतींना केले आहे. शासनाच्या विकास निधी अंतर्गत नागरिकांना मुलभूत सोई सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशासनाचे कार्य तत्पर आहे. परंतु या विकास कामांना गतीशील करण्याचे कार्य ज्या व्यक्तींवर आहे त्यांच्याद्वारेच या विकास कामांना बगल देण्यात येत आहे. आमगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विकास कामांचा आराखडा मंजूर करुन घेतला. या विकास कामांना पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे ई-निविदामार्फत कामांना गती देणे अपेक्षित आहे. परंतु शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवित असल्याची बाब ग्रामपंचायतीतून पुढे येत आहे. ई-निविदा प्रकाशित न करताच कामांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या एजन्सी व साहित्य पुरवठा करणारे ट्रेडर्स यांच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे. बांधकाम ई-निविदेला बगल देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करुन विकास कामांची गुणवत्ता राखावी, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
ई-निविदेला ग्रामसेवकांचा खो
By admin | Updated: April 30, 2015 01:08 IST