केशोरी : मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र शासन गाव स्वच्छता अभियान राबवित आले आहे. ही योजना गावागावात पोहोचली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक गावांतील ग्रामपंचायतीने पुरस्कार स्वीकारून गावाच्या प्रथम दर्शनी भागात हागणदारीमुक्त गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे, असे फलक लावून गाव हागणदारी मुक्तीचा गवगवा केला आहे. परंतु या गावात फेरफटका मारला असता गावातील कडेला, सार्वजनिक रस्त्यावर गावाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर नागरिक शौचास बसून घाण करीत असल्याचे चित्र आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात अनेक ग्रामपंचायतींनी गाव स्वच्छता अभियान राबवून शासनाकडून लाखो रुपयांचे पुरस्कार घेतले. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे फलक गावाच्या प्रथम दर्शनी भागात लावून गाव स्वच्छतेचा परिचय दिला आहे. पावसाळ्याच्या दिवसात आजाराचे प्रमाण वाढू नये, म्हणून शासनाने गाव स्वच्छता अभियान राबवून गाव हागणदारीमुक्त करण्याची योजना सुरू केली. या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानात भाग घेऊन पुरस्कार प्राप्त केले आहेत. मात्र गाव हागणदारीमुक्त फक्त फलकापुरतेच राहिले आहे. मानवनिर्मित घाणीमुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने कागदोपत्री गाव स्वच्छ झाल्याचा देखावा करण्यात धन्यता मानली आहे. या परिसरातील गावात फेरफटका मारला असता सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, गावाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नागरिक शौचास बसत असल्याचे दिसून येत आहेत. गाव स्वच्छता अभियान राबवून गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे कागदोपत्री जाहीर करुून गावाच्या प्रथमदर्शनी स्वच्छ भारत मिशन एक पाऊल स्वच्छतेकडे हागणदारीमुक्त गावात आपले स्वागत आहे. आम्ही गाव स्वच्छ ठेवण्यास कटिबध्द आहोत असे फलक लावले आहेत. काही गावात प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मोफत शौचालय बांधून देण्यात आली, तरीही शौचालयात न जाता उघड्यावर शौचास बसून घाण निर्माण करीत असल्याचे दिसून येते.