खातिया : गोंदिया तालुक्यातील गर्रा, सावरी, लोधीटोला, घिवारी, पांढराबोडी व जवळच्या अनेक गावांमध्ये शेतकरी धानपिकांसह विविध भाजीपाल्याचे पीक घेतात. पण सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे सर्वच पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला असून या क्षेत्रातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. वातावरणात बदलामुळे धानपिकावर अळींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरी विविध किटनाशक औषध फवारणीसाठी महागड्या किटनाशक औषधीचा वापर करत आहेत. अशी परिस्थिती भारी धानाच्या पिकावर दिसत आहे. गोंदिया तालुक्याच्या काही भागात शेतकरी धानाच्या पिकाबरोबरच भेंडी, बरबटी, वांगे, भेंदरे, गोबी, कारल्या, मुळा व विविध प्रकारच्या भाज्यांचीही लागवड करतात. पण सध्या वातावरणामध्ये बदल आल्यामुळे या सर्व भाजीपिकांवर विविध प्रकारचे अळ्या तयार होऊन भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठाच नुकसान सहन करावा लागणार आहे. मागील महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांना पावसाच्या कमी प्रमाणामुळे हलक्या धानाचे पीक काळताना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आणि आता वातावरणात झालेल्या बदलामुळे भारी धानावर विविध रोगांचे आक्रमण झाल्याने ‘आमदनी अठनी, खर्चा रुपया’ अशी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. शासनाच्या वतीने या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विविध रोगांपासून आपल्या पिकांना कसे वाचवता येईल व त्यासाठी कोणती उपाययोजना करावी, गावागावात शिबिरे घेवून जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांना निराशेकडून आशेकडे वळविण्यासाठी कमी दरामध्ये शेतकऱ्यांना विविध किटनाशक औषधींचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
धानासह विविध पिकांवर किडींच्या प्रकोपाने भरली धास्ती
By admin | Updated: October 30, 2014 22:53 IST