शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी : गोंदियातील उड्डाणपुलाचे १२ ला लोकार्पणगोंदिया- जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देण्याचा मुद्दा सर्वांनी उपस्थित केल्याने त्याबाबतचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. याशिवाय इतरही मुद्द्यांवर यावेळी चर्चा घडवून आणण्यात आली. तसेच गोंदियातील उड्डाणपुलाचे लोकार्र्पण १२ जुलै रोजी होणार असल्याची माहिती पालक मंत्री देशमुख यांनी दिली.संपूर्ण राज्यभरात पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्येवर शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येतील. शिवाय शेतकऱ्यांना आवश्यक ती बियाणे व खते यांचेही योग्य प्रमाणात नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी कृषी विभागाला दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल, आ.डॉ.खुशाल बोपचे, आ.राजकुमार बडोले, आ.रामरतन राऊत, अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव पी.एस.मीना, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य अॅड.मधुकरराव किंमतकर, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला शेतकऱ्याच्या समस्येला हात घालण्यात आला. भाताच्या जिल्ह्यात पाऊस नसल्याने पहिल्या पेरण्या जळाल्या. दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवले असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपाययोजना करून या समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी आ.डॉ.बोपचे व आ.जैन यांनी केली. यावर येत्या दोन-तीन पाऊस न आल्यास दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पीक परिस्थीतीचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घेतला. ९ जुलैपर्यंत फक्त ३२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्याच्या नर्सरीतील पिकांची ७० टक्के रोपे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अश्या शेतकऱ्यांनी ८४०० हेक्टरवर रोवणी केली आहे. यावर या समस्येवर उपाययोजना करण्याबरोबरच कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन करण्याबाबतचे निर्देश पालक सचिव यांनी कृषी विभागाला दिले. गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून असा ठराव राज्य शाासनाकडे प्रस्तावित करावा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली व पालकमंत्री देशमुख यांनी ती मागणी मान्य करून शासनाकडे ती प्रस्तावित करण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीला विष्णु बिंझाडे, मिलनदास राऊत, रुपाली टेंभुर्णे, जागेश्वर धनभाते, राजेश चतुर, राजेश चांदेवार, कुंदन कटरे, बालकृष्ण पटले, पारबता चांदेवार, देवकी नागपुरे, जगदिश बहेकार, रमेश लिल्हारे आदी नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.
दुष्काळाच्या मुद्द्यावरून गाजली ‘डीपीसी’
By admin | Updated: July 10, 2014 23:38 IST