विजय मानकर यंदा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. १४ एप्रिल हा जयंतीचा दिवस असला तरी पाच दिवस आधीपासून आणि नंतरच्या पाच दिवसापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. तालुक्यात आमगाव खुर्द (सालेकसा) येथे तालुकास्तरीय चार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते. शेवटच्या दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले येऊन गेले व समाजाला प्रेरणादायी व हृदयस्पर्शी अशा संबोधन करुन गेले. एकाअर्थी सालेकसा येथील यंदाचे आयोजन हे ऐतिहासिक ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.जयंती उत्सवाच्या या १० दिवसांदरम्यान तालुक्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा,’ हा संदेश तालुक्यात एक-दोन ठिकाणचा अपवाद वगळता अनेक ठिकाणी पोहोचलाच नसल्याचे दिसून आले. बाबासाहेबांनी दिलेला मंत्र कोण्या एका समाजासाठी मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी, नव्हे तर जगासाठी सार्थक ठरणारा मंत्र आहे. परंतु आज त्या मंत्राचा विसर पडलेले लोक डॉ.आंबेडकरांना आदरांजली वाहताना दिसून आले. इतर समाजातील लोकसुद्धा मोठ्या उत्साहात प्रत्येक आयोजनात सहभागी होताना दिसले ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. एवढेच नाही तर शासकीय स्तरावर सुद्धा मनापासून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. परंतु शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणीपैकी शिका या संदेशाचा अंमल बहुतांश ठिकाणी झाला. संघर्ष करण्याचा प्रयोग तर अनेक वर्षापासून होत आहे. परंतु मधला शब्द म्हणजे ‘संघटीत व्हा’ याकडे आजही दुर्लक्ष होत आहे. यामध्ये स्वत:ला उपासक-उपासिका म्हणवून घेणारेच काही लोक जेव्हा संघटीत झालेले दिसून येत नाही. शिकले पण संघटीत झाले नाही, म्हणून संघर्ष करताना अनेकदा अपयश हाती येताना दिसते.सालेकसा तालुक्यात अनेक गावात बौद्ध समाज गटागटात, वर्गा-वर्गात व जाती-उपजातीचा आधार घेऊन विभागलेला आहे. याचा गैरफायदा स्वार्थाचे राजकारण करणारे लोक नेहमी घेत असतात. ही बाब समाजबांधवांनी समजून घेणे आवश्यक आहे. राजकारण करा, पण समाजाला विघटीत आत्मघाती व नुकसान देणारे राजकारण न करता बाबासाहेबांसाठी तरी स्वत: नमते घेत संघटित होऊन काम करणे आणि संघर्ष करणे गरजेचे आहे. तर बाबासाहेबांची खरे अनुयायी आहात हे सिद्ध होईल. प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या एका भारतीय महापुरुषाची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली. केवळ भारतच नाही तर यावर्षी १५६ देशात बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. याचा केवळ आंबडकरी जनतेलाच नाही तर तमाम भारतीयांना अभिमान असायला हवा. या तालुक्यात बाबासाहेबांच्या या शतकोत्तर जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करूया.