आमगाव : महाराष्ट्र सरकारला महिन्याकाठी दिड ते दोन कोटी रुपयांचा महसूल देणारे देवरी चेकपोस्ट १२ सप्टेंबरपासून बंद अवस्थेत असल्याने सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवर असलेल्या देवरी चेकपोस्टवर १२ सप्टेंबर २०१४ रोजी एसीबी भंडाराव्दारे वाहन निरीक्षक विकास कावळे यांना ९ हजार रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले होते. तेव्हापासूनच एसीबीच्या भीतीपोटी आरटीओ अधिकाऱ्यांनी चेकपोस्ट बंद ठेवले आहे. त्यामुळे महिन्याला कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे. एसीबीची दहशत आरटीओच्या नागपूर विभागामध्ये पहायला मिळत आहे. या भीतीपोटी ज्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी येथे लावली जाते. ते अगोदरच खोटी वैद्यकीय रजा घेऊन सुट्टी जात असल्याचे बघायला मिळत आहे. कुणीही या चेकपोस्ट काम करायला तयार नाही. अगोदर दिवसाला कोण आठ तासाच्या तीन शिफ्टमध्ये महिन्याला आठ ते दहा अधिकारी येथे ड्युटी करायचे. परंतु सध्या स्थिती उलट आहे. फक्त एकच अधिकारी येडे ड्युटी करीत आहे. ती सुध्दा आराम करण्याची दररोज येथून हजारो ट्रकांची ये-जा सुरू असते. त्यामध्ये कित्येक ट्रक ओव्हरलोड जात असतात. कित्येक जणांकडे महत्वाचे कागदपत्रे नसतात. परंतु मागील तीन महिन्यापासून या सर्व गाड्यांची कुणीच चौकशी करीत नसल्याने सर्व वाहने न थांबता सरळ जात आहेत. अगोदर येथे सीएफच्या नावानी काही वाहनांकडून हजार ते दोन हजार रुपयाची पावती फाडली जायची व अध्यापेक्षा जास्त वाहनांकडून पावती न देता पैसे घेऊन सोडले जात होते. परंतु १२ सप्टेंबरला एसीबी ने धाड घातली तेव्हापासून हा गैरप्रकार बंद झाला कारण चेकपोस्ट तेव्हापासून बंद अवस्थेत आहे. सध्या सकाळच्या वेळेस दोन तास चेकपोस्ट सुरू ठेवून गाड्यांची चौकशीच्या नावावर ड्युटीवर असणारे अधिकारी राजस्व कमी व स्वत:च्या कमाईकडे जास्त लक्ष देत आहेत. या अगोदर आरटीओ अधिकारी खाजगी माणसांना सोबत ठेवून लाखांची माया गोळा करीत होते.
तीन महिन्यांपासून देवरी चेकपोस्ट बंद अवस्थेत
By admin | Updated: December 18, 2014 01:19 IST