गोंदिया : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. शुक्रवारी (१ मे) महाराष्ट्र दिनाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय कारंजा येथील मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक संजय ठवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील वास्तव्याने पावन झालेल्या वास्तू खरेदीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकरांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा संकल्प आमच्या सरकारने केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील ११८ रास्तभाव दुकाने महिला स्वयंसहायता बचत गटांना देण्यात आले आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल असून आरोग्य सेवा देण्यास जिल्हा नागपूर मंडळात प्रथम असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. वनालगतच्या गावातील ७७२३ कुटुंबाना एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.प्रारंभी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी पोलीस, गृहरक्षक दल यांच्या परेडचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)
पर्यटनातून रोजगार निर्मिती
By admin | Updated: May 2, 2015 01:41 IST