गोंदिया : नद्यांना पूर आल्यावर नदीकाठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरुन जीवित व वित्तीय हाणी होऊ नये, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता समन्वय असणे गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रकल्पातील पाणी कोणत्या वेळेवर व केव्हा सोडणार या आराखड्यासोबतच योग्य समन्वयासाठी भ्रमणध्वनीवर संदेश देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी दिले. वैनगंगा, बाघ व इतर नद्यांना येणाऱ्या पूरामुळे जिवीत व इतर हानी हावून नये याकरीता आंतराज्यीय पूर नियंत्रण समन्वय समितीची सभा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.सैनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला बालाघाटचे (मध्य प्रदेश) जिल्हाधिकारी व्ही.किरण गोपाल, बालाघाटचे पोलीस अधीक्षक गौरव तिवारी, भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी रवी कुंभारे, शिवणीचे अधीक्षक अभियंता आर.के. जिवारी, कार्यकारी अभियंता अशोककुमार पौरकर, बरघटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनसिंग पटेल, शिवनीचे उपविभागीय अधिकारी के.सी. पराते, बालाघाटचे दीपक आर्या, राजीव सागर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एफ.के. भेमटे उपस्थित होते. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे यांनी यावेळी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. संजय सरोवराचा जिल्ह्याला धोका असून संजय सरोवरातील पाणी सोडल्यामुळे वैनगंगा नदीला पूर येतो. शिवणी ते रजेगाव हे १७० किमी अंतर असून यावेळी बाघ नदी, भंडारा जिल्ह्यातील सूर नदी, बावनथडी, चूलबंद, कन्हान व गाढवी नदीचे क्षेत्रही यावेळी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे दाखविण्यात आले. तेथील समन्वय साधण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. पूर परिस्थितीने गोंदिया जिल्ह्यातील ८७ गावे प्रभावित होवू शकतात. तसेच संजय सरोवर, पूजारीटोला व बावनथडी येथील पाण्याच्या पातळीचे होणारे प्रमाण याचीही माहिती यावेळी देण्यात आली. संबंधित विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता आवश्यक त्या सर्व बाबी प्रशासनाने केल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे धरणाच्या क्षमतेनूसार पाण्याचा साठा करावा असेही त्यांनी सांगितले. बालाघाटचे जिल्हाधिकारी व्ही.किरण गोपाल यांनीही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवण्याबाबत निर्देश दिले. (जिल्हा प्रतिनिधी)
समन्वयातून ठेवणार पूर परिस्थितीवर नियंत्रण
By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST