अर्धा तासच मिळते पाणी : टिल्लू पंपांमुळे नागरिक पाण्यापासून वंचितगोंदिया : गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच यावर्षी गोंदिया शहरात दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा करण्याची वेळ जीवन प्राधिकरण विभागावर आली. मात्र त्यातही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सकाळच्या वेळी एक तास नळ सुरू ठेवले जात असले तरी प्रत्यक्षात अर्धा तासच पाणी मिळत असल्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी हापशांवर धाव घ्यावी लागत आहे.शहरात अनेक ठिकाणी टिल्लू पंप लावण्यात आले असून त्याद्वारे अधिक प्रमाणात पाणी खेचण्यात येत आहे. काही भागात जुन्या पाईप लाईन असल्यामुळे त्यांना योग्यरित्या पाणी पुरवठा होत नसावा, असेही संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग अशा पाणी टंचाईच्या काळात पंपधारकांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही कधी करण्यात येईल, असा सवाल नागरिक करीत आहेत. एकीकडे पिण्याचे पाणी अधिक प्रमाणात तर दुसरीकडे अल्प प्रमाणात उपलब्ध होते. या समस्येचे निवारण करणे टंचाईच्या काळात गरजेचे झाले आहे. आता बावणथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र बावणथडी प्रकल्पाचा यात काहीही संबंध नसल्याचे मजीप्राचे मडके यांनी सांगितले.शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी पाच टाक्या आहेत. त्यातच इतर जोडण्या वगळता एकूण १२ हजार ०७४ नळ कनेक्शन आहेत. एका व्यक्तीसाठी १३५ लिटर पाणी पुरविले जात होते. मात्र आता टंचाईच्या काळात हा प्रमाण १०० लिटरपर्यंत आणण्यात आला आहे. दोनदा पाणी पुरवठा करण्यासाठी अधिक खर्च व अधिक मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे दिवसातून एकदाच भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात आला तर पाणी, वेळ, खर्च व मनुष्यबळ वाचते, असे अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे. त्यातच नदीच्या पाणी आटल्याने पाऊस येईपर्यंत तरी एकदाच पाणी पुरवठा करण्याचे धोरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंगिकारले आहे. दुसरीकडे नळ जोडणी करण्यासाठी दलालांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. ‘पाच हजार रूपये द्या अन् त्वरित कनेक्शन घ्या’ हे धोरण या दलालांचे आहे. प्रसंगी पाच ते दहा हजार रूपयांपर्यंतही त्यांची मागणी असते. अशा बेकायदेशिर नळ जोडण्या शहरात अनेक ठिकाणी आढळल्या आहेत. त्यांची तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अशा बेकायदेशिर नळ जोडण्या असलेल्यांना कार्यालयात बोलावले जाते. त्या जोडण्या रेग्युलर करण्यासाठी त्यांना सांगण्यात येते. तसेच त्यासाठी त्यांना वेळही दिला जातो. जर बेकायदेशीर कनेक्शनधारक उपस्थित झाले नाहीत तर त्यांच्यावर सरळ एफआयआर दाखल केले जाते. चोरीचा गुन्हा दाखल केला जातो. उपविभागीय अभियंता यांचे तसे आदेशही आहेत.सर्वसाधारणपणे घरगुती नळजोडणीसाठी (१५ एमएम) एक हजार ७०० रूपये खर्च येतो. तर (२० एमएम) जोडणीसाठी तीन हजार ११० रूपये खर्च येतो. हा आॅफिशियल खर्च असून त्यात मीटर, पाईप व इतर खर्चाचा समावेश असतो. मात्र दलाल पाच ते दहा हजार रूपयांच्या दरम्यानची रक्कम घेवून बेकायदेशिर नळ कनेक्शन करून देतो. त्यामुळे पाण्याचे पैसे भरावे लागणार नाही, ही बाब हेरून काही जण बेकायदेशिर जोडणी दलालांमार्फत करून घेतात. या बाबीला गांभीर्याने घेणे आता गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)जोडणीसाठी पायपीट, मात्र बिलाचे विस्मरणनळ जोडणी मिळवून घेण्यासाठी नागरिक अनेक चकरा मारतात. एकदा नळजोडणी झाली की मग बिलाचे पैसे भरण्याचे त्यांना विस्मरण होते. उलट मजीप्रामधून ग्राहक नागरिकांना फोन करून बिल भरण्याचे स्मरण करून दिले जाते. नळ जोडणी घेण्यासाठी आधी कार्यालय बघा, नंतर फॉर्म भरून घ्या व फॉर्म नंबर घ्या. दिलेल्या मुदतीत जोडणी न मिळाल्यास एकदा पुन्हा कार्यालयाशी संपर्क साधा. जोडणी मिळाल्यानंतर किंवा त्यापूर्वीसुद्धा काही तक्रारी असतील तर त्या सांगा. नियमित बिल भरा. स्वस्त दरात शुद्ध पाणी मिळते, याचा लाभ घ्या. मात्र बेकायदेशिर जोडण्या घेवू नका, असे मजीप्राच्या अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.माकडांची टोळी पाण्यासाठी गोंदियातमाणसांसोबत आता जंगलातील राहणाऱ्या प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोंदियात शहरात शुक्रवारी माकडांच्या अनेक टोळ्या पाण्याच्या शोधात दाखल होताना दिसून आले. नागरी वसाहतीत माकडे शिरल्यानंतर ते पाण्याचा शोध घेऊन लागले. त्यामुळे काही सहृदयी नागरिकांना त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. एकीकडे पाणी मिळणे कठीण झाले असताना मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करून देऊन नागरिक दाखवित असलेली माणुसकी कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.तिरोड्यात तीन टाक्या प्रस्तावितगोंदियानंतर महत्वाचे शहर म्हणून तिरोड्याची ओळख आहे. तिरोड्यात काही प्रमाणात पाणी साठा आहे, मात्र बावणथडी प्रकल्पाचे पाणी काही पोहोचले नाही. त्यामुळे तेथेही पाणी टंचाई आहे. येथे काही ठिकाणी जुन्या पाईप लाईन असल्यामुळे पाणी पुरवठा असंतुलित होत आहे. शिवाय तिरोडा शहरासाठी एकच पाणी टाकी असल्यामुळे पाणी टंचाई उद्भवते. आता तिरोड्यासाठी तीन पाणी टाक्या प्रस्तावित असल्याचे मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापैकी एक पाणी टाकी मोठी व उंच राहणार आहे. या उंच टाकीतून उर्वरित टाक्यांमध्ये सतत पाणी पुरवठा होत राहील. मात्र हे सर्व सद्यस्थितीत प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाण्यासाठी भटकंती सुरू
By admin | Updated: May 14, 2016 01:41 IST