कित्येक भागांतील पथदिवे बंद : कंत्राटदाराकडून साहित्य पुरवठा नाही गोंदिया : वीज साहीत्य पुरवठा व दुरूस्ती करणाऱ्या कंत्राटदाराचे सहा महिन्यांचे बील थकीत असल्याने त्याने साहीत्य पुरवठा बंद केला आहे. परिणामी शहरातील कित्येक भागांतील पथदिवे बंद पडून आहेत. यामुळे शहर रात्रीला काळोखात असून शहरवासीयांची चांगलीच फसगत होत आहे. नगर परिषदेकडून शहरातील पथदिव्यांना लागणारा वीज साहीत्यांचा पुरवठा व दुरूस्तीसाठी राजेश नानवे यांच्याकडे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार कंत्राटदार नानवे यांचे कर्मचारी शहरातील पथदिव्यांचे कामकाज बघतात. मात्र मागील काही दिवसांपासून शहरातील कित्येक भागांतील पथदिवे बंद पडून असल्याचे निर्दशनास येत असून शहरवासीयांची ओरडही आहे. सध्या पावसाळ््याचा काळ असून सरपटणारे प्राणी व किटकांचा धोका वाढला आहे. मात्र कंत्राटदार नानवे यांचे सहा महिन्यांचे सुमारे १८ लाखांचे बील थकीत असल्याने त्यांनी साहीत्य पुरविणे बंद केले आहे. परिणामी पथदिवे बंद असून शहरात रात्रीला काळोख असतो. शहरातील पथदिवे बंद पडून असल्याने शहरवासीयांना रात्रीला घराबाहेर पडणे धोकदायक ठरत आहे. ही बाब लक्षात घेत नानवे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून किमान तीन महिन्यांचे बील काढून देण्याची मागणी करीत तसे पत्र दिले आहे. जेणेकरून काही पैसे हाती आल्यास बंद असलेल्या पथदिव्यांत नवे साहीत्य टाकून त्यांना सुरू करता यावे. यावर मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना एका महिन्याचे बील काढून देण्याचे व त्यानंतर टप्याटप्याने बील काढून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर नानवे यांनी तीन महिन्यांचे बील काढून देण्याची मागणी करीत मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनावरून साहीत्य पुरविणे सोडून पथदिव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. यासाठी नानवे यांनी त्यांच्याकडे असलेले साहीत्यही पुरविल्याचे सांगीतले. मात्र नानवे यांचे सुमारे १८ लाखांचे बील थकीत असल्याने त्यांनाही ते साहीत्य खरेदी करीत असलेल्या व्यापाऱ्यास तसेच त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना पैसे देण्यात अडचण होत आहे. यामुळे त्यांनी तीन महिन्यांचे नऊ लाखांचे बील काढून देण्याची मागणी केली आहे. आता सोमवारपर्यंत हे बील निघाले तर ठीक अन्यथा सोमवारपासून पुन्हा कामबंद करणार असल्याचेही नानवे यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी) विवेकानंद कॉलनीवासी धोक्यात विशेष म्हणजे शहरातील विवेकानंद कॉलनीतील नागरिकांना पथदिवे बंद असल्याचा जास्त फटका बसत असून त्यांचा जीव धोक्यात असल्याचेच बोलावे लागेल. नव्याने वसलेल्या या कॉलनीतील कित्येक पथदिवे बंद पडून आहेत. त्यामुळे रात्रीला काळोख असतो. कॉलनीत साप, विंचू व किटकांचा वावर असल्याने कॉलनीवासींना रात्रीला घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तक्रार करूनही काहीच फायदा होत नाही. त्यामुळे कॉलनीवासीयांत चांगलाच रोष व्याप्त आहे. प्राथमिक सुविधांचाच विसर नगर परिषदेच्या अंदाजपत्रकासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत स्वच्छता,रस्ते व वीज या तीन प्राथमिक सुविधांवर जोर देत त्यावर अधिकचे नियोजन करण्याच्या सूचना सदस्यांनी दिल्या होता. वास्तवीक मात्र त्या विपरीत परिस्थिती आज शहरात दिसून येत आहे. स्वच्छता व रस्त्यांची स्थिती कुणाशीही लपलेली नाही. उरली विजेची बाब त्यातही नगर परिषद फेल ठरत असल्याचे दिसत आहे. नागरिक नगर परिषदेच्या वीज विभागाकडे तक्रार देत आहेत. मात्र कंत्राटदाराने हातवर केल्याने विभागातील कर्मचारी फक्त तक्रारींची नोंद करण्याचे काम करीत आहेत.
शहर रात्रीला काळोखात
By admin | Updated: July 23, 2016 02:12 IST