सौंदड : जि.प. गोंदिया लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आमगाव उपविभाग अंतर्गत सौंदड येथील तलावाच्या वेस्टवेअरच्या खाली २०० मीटरवर सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु आहे. या बांधकामावर १६ जानेवारी २०१४ ते २० जानेवारी २०१४ या दरम्यान ६ घमेले रेती, १० घमेले गिट्टी व १ घमेला सिमेंट या प्रमाणात मिश्रण करुन काँक्रिट करून बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. त्याला लागूनच असलेल्या सौंदड-सुंदरी रोडवर या वेस्टवेअरच्या पाण्याने पावसाळ्यात २-३ दिवस शेती पाण्याखाली बुडून असते. ज्या ठिकाणी बंधाऱ्यांची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला आहे. जि.प. लघुपाटबंधारे विभाग गोंदिया उपविभाग आमगाव येथील उपविभगीय अधिकारी हे आमगाव उपविभाग कार्यालयात अभियंता म्हणून कार्यरत होते. परंतु गिरी यांची कार्यकारी अभियंता म्हणून नागपूर जि.प. मध्ये पदोन्नती झाली. गिरी यांच्या जागी आमगाव येथील उपविभागीय अधिकारीचा कार्यभार शाखा अभियंता शेट्ये यांना मागील एक वर्षापासून आहे. सडक /अर्जुनी, देवरी व आमगाव हे तीन तालुके आमगाव उपविभागात येतात. येथील शाखा अभियंता यांच्या मनमर्जी कार्यभारामुळे संबंधित विभागाचे कर्मचारीही त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. सन २०१२-१३ मध्ये लघू पाटबंधारे विभाग साकोली अंतर्गत शाखा अभियंता चंदन बटवे यांनी याचा वेस्टवेअरच्या खाली बंधारा बांधण्यासाठी काम सुरु केले होते. त्यावेळी बंधाऱ्याच्या कंत्राटदाराला सौंदड येथील शेतकऱ्यांनी बांधकाम अडवून काम बंद पाडले होेते. सौंदड तलावाच्या वेस्टवेअरपासून ५०० मीटरवर भंडारा, गोंदियाची सीमा असल्याचे दर्शवून हे काम रोखण्यात आले होते. परंतु लघुपाटबंधारे उपविभाग आमगाव अंतर्गत सौंदड तलावाच्या याच वेस्टवेअर खाली तयार होत असलेल्या बंधाऱ्यालाही स्थानिक शेतकऱ्यांनी रोखले. परंतु शाखा अभियंता यांनी कंत्राटदाराला कल्पना दिली की, स्थानिक ट्रॅक्टरवाला शेतकऱ्याला पकडून हे काम कसेतरी पूर्णत्वास जावे अशी शक्कल लढविली. सदर बांधकामात कोणी अडथळा आणेल म्हणून शाखा अभियंता यांनी स्थानिक कंत्राटदारच हे काम करीत असल्याने कुणीही बोलण्यास तयार नाही. याचाच फायदा घेवून कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने स्वत:च्या मनमर्जीने काम करीत आहे. या पावसाळ्यात वेस्टवेअरवरुन पाणी बाहेर फेकल्यानंतर या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन पीक पाण्याखाली येवून धानपीक नष्ट होईल. परंतु तलावाची पाळ फुटल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येवून शेतजमिनीची भयंकर हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच करण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांचे कामही अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. परंतु शाखा अभियंता व स्थानिक पाणी वाटप कमेटी व स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे डोळेझाक करीत आहेत. (वार्ताहर)
गरज नसलेल्या ठिकाणी बंधाऱ्याचे काम
By admin | Updated: July 10, 2014 23:40 IST