गोंदिया : मागील दोन्ही हंगाम शेतकर्यांना मारक ठरले आहे. खरीपाने तर शेतकर्यांना कर्जाशिवाय काहीच दिले नाही. रब्बीनेही काही प्रमाणात मिळणारा आधार हिरावून घेतला. वरूण राजाची अवकृपा याला कारणीभूत ठरली. कर्जाचे ओझे अजूनही शेतकर्यांच्या डोक्यावर आहे. लग्नसराईत पुन्हा कंबरडे मोडत आहे. अशातच खरीप हंगाम तोंडावर आला आहे. एवढय़ा कमी वेळात कुटुंबाला सावरत खरिपाची तयारी कशी करायची, या विवंचनेत शेतकरी पडला आहे. तरीही त्याची जुळवाजुळव सुरू झाल्याचे दिसत आहे. वरूणराजाने मागील वर्षी संपूर्ण विदर्भातच आपली अवकृपा दाखविली. त्याच्या आदल्या वर्षीही विविध रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकर्यांचे खरिपात नुकसान झाले होते. तरीही मागील वर्षी मोठय़ा उत्साहात शेतकर्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात हजारो हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर वरूणराजाची वक्रदृष्टी पडली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे शेतकर्यांना खरीप हंगाम जगवायला संधीच दिली नाही. अतवृष्टीमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी चार वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जिल्ह्यातील पिके नष्ट झाली होती. मात्र कृषी विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षाच करावी लागली. शासनाची मदत रब्बी हंगामातही कामात येऊ शकली नाही. अतवृष्टीत जिल्ह्यातील अनेक शेतजमीन पार खरडून गेली होती. मात्र यातही अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहिले. काही भागात कृषी विभागाने व्यवस्थित सर्वेक्षणच केले नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा शासनापर्यंत पोहचू शकला नाही. मागील वर्षीचेच कर्ज शेतकर्यांच्या डोक्यावर आहे. रबी हंगामातही कर्ज काढूनच शेतकर्यांनी पिकांची लागवड केली. यावेळीही शेतकर्यांना अकाली पावसाचा सामना करावा लागला. रबी हंगाम कर्जात बुडालेल्या शेतकर्यांना आधार देईल, असे वाटत होते. मात्र हरभरा व गव्हाचे नुकसान मोठे नुकसान झाले. आता पुन्हा नव्या उमेदीने बळीराजा शेतीकडे सरसावला आहे. मात्र होतात दमडीही नसल्याने पिकांची लागवड कशी करायची, हा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. पुन्हा शेतकर्यांचे कंबरडे मोडत आहे. ज्या शेतकर्यांनी मार्च अखेरपर्यत कर्जाची परतफेड केली, त्यांना बँकेकडून पुन्हा कर्ज उचलता येऊ शकते. मात्र अनेक शेतकरी मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यांना बँकेकडून कर्ज मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मोठय़ा विवंचनेत सापडले आहेत. तरीही खरिपात स्वस्थ बसता येणार नसल्याने शेतकर्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. सध्या शेतकरी याच प्रक्रियेत व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शेतातही काही ठिकाणी जमीन वखरण्याची कामे सुरू झाली आहे. शेतखत शेतात टाकणे पडीत जमिनीवरचे झुडपे काढणे सुरू झाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
खरिपाने मारले, रबीनेही तारले नाही
By admin | Updated: May 15, 2014 23:44 IST