राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम : १०४ योजनांचे काम पूर्ण कपिल केकत गोंदिया राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ९८ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना ‘करंट’ची प्रतीक्षा आहे. विद्युत कनेक्शन न मिळाल्यामुळे या योजना तयार असूनही ग्रामीण नागरिकांची तहान भागविण्यात अपयशी ठरत आहेत. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १०४ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे काम हाती घेतले होते. फेब्रवारी २०१५ पर्यंत या १०४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. योजनांचे काम पूर्ण झाल्याने विभागाने वीज वितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. तर वीज वीतरण कंपनीकडून आलेल्या डिमांंडनुसार आतापर्यंत ५२ योजनांची डिमांड भरून झाली असून सहा योजनांची वीज जोडणी झाली आहे. मात्र उर्वरीत ९८ योजना वीज कनेक्शन नसल्यामुळे उभ्या असून पांढरा हत्ती ठरत आहे. योजना आहेत मात्र त्यांना चालविण्यासाठी वीज कनेक्शन नसल्यामुळे या योजना ग्रामीणांची तहान भागविण्यात अपयशी ठरत आहेत. ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सुटावी व कुणी तहानलेले राहू नये या उदात्त हेतूतून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने या योजना तयार केल्या. मात्र वीज कनेक्शन अभावी या योजनांचे फलीत लाभत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वीज कनेक्शनसाठी विभागाचा वीज कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून मध्यंतरी या विषयाला घेऊन बैठक झाली आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून काही तांत्रीक कारणांमुळे कनेक्शनचे काम रेंगाळत चालल्याचे कळले. आता यावर काय तोडगा निघतो व कधी योजनांना वीज कनेक्शन मिळते याकडे मात्र ग्रामीणांचे लक्ष लागले आहे.
९८ योजनांना ‘करंट’ची प्रतीक्षा
By admin | Updated: December 6, 2015 01:52 IST