नरेश रहिले
गोंदिया : बेपत्ता, अपहरण झालेल्या किंवा प्रियकराच्या आमिषाला बळी पडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींना शोधण्यात गोंदिया पोलिसांनी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून उत्तम कामगिरी केली. सन २०१८ पासून आजपर्यंतची परिस्थिती पाहता ३२ अल्पवयीन मुले व २६४ मुली पळून गेल्या होत्या; परंतु आतापर्यंत गोंदिया पोलिसांनी १० ऑपरेशन मुस्कान राबवून ३० मुले व २४७ मुलींना शोधून काढले आहेत. आज घडीला २ मुले व १७ मुली पोलिसांना सापडल्या नाहीत. शोधून काढलेल्या मुला-मुलींना त्यांच्या मात्या-पित्यांच्या स्वाधीन केले.
भीक मागण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून भीक मागण्यास प्रवृत्त केले जाते. काहींना वाम मार्गाकडे वळविले जाते. १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शाेधून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवीत आहे. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात १ अधिकारी व २ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक, रुग्णालय, उद्यान, चौक, रेल्वे स्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांचा शोध गोंदिया पोलिसांनी घेतला.
...........................
अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना
सन २०१८- ८२
सन २०१९- ९९
सन २०२०- ३९
सन २०२१- ४४
..............
मुली चुकतात कुठे?
१) आपण उपाशी राहून मुला-मुलींसाठी उन्हातान्हात राबणाऱ्या आई-वडिलांची जाणीव मुली ठेवत नसून नुसत्या आकर्षणापोटी अनोळखी मुलाच्या नादी लागतात.
२) आई-वडिलांनी त्यांचे करिअर घडविण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मोबाइलसारख्या वस्तू दिल्यात, तर त्याचा योग्य फायदा न घेता प्रेम जुळविण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
३) आई-वडिलांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेतात आणि सुशिक्षितांच्या घरची मुलगी शिकण्याच्या नावावर घराबाहेर पडल्यावर मित्र-मैत्रिणींच्या नादात वाया जात आहे.
................
मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून त्यांचे मित्र व्हा
- आई-वडिलांनी मुला-मुलींची प्रत्येक हौस पुरविणे गरजेचे नाही. त्यांना आवश्यक तेवढीच साधने उपलब्ध करून द्यावीत.
- मुले-मुली शाळेच्या नावावर किंवा शिकवणीच्या नावावर घराबाहेर असतात. त्यांची योग्य माहिती पालकांनी ठेवावी. आपल्या पाल्यांवर नजरही ठेवावी.
- आई-वडील मोबाइलमध्ये आणि मुले-मुली आपल्या मित्रांमध्ये मश्गूल राहत असतील तर मुला-मुलींच्या हातून सहजरीत्या चूक होऊ शकते. यासाठी मुला-मुलींना आपले चांगले मित्र बनवा.
- प्रत्येक घरात संवाद होणे आवश्य आहे. दररोजच्या संवादातून आपल्या मुला-मुलीचे पाऊल कोणत्या दिशेने जात आहे, याचा वेध पालकांना लागू शकतो.