लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'लोकमत'ला रात्री खास माहिती प्राप्त झाली, त्यानुसार 'उटा'चे काही महत्त्वाचे नेते एकत्रपणे मुख्यमंत्री सावंत यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी कायमच गोविंद गावडे यांना सांभाळून घेतले आहे, याची कल्पना उटाच्या नेत्यांना आहे. मात्र, यावेळी मुख्यमंत्री खूप दुखावले गेले आहेत. 'उटा'च्या नेत्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
गोविंद गावडे यांच्याकडूनही कायम सावंत यांचा आदर केला जातो. त्या दिवशी गावडे यांच्या भाषणाचा रोख हा मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणे, असा नव्हता हा मुद्दा सीएमसमोर ठेवण्यात आला. आदिवासी कल्याण खात्याकडून काही कामे मुद्दाम केली जात नाहीत. काहीजण छुपी खेळी खेळतात. ही खेळी कोण खेळतो याची कल्पना आता मुख्यमंत्र्यांनाही आली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी जर खात्यांतर्गत चौकशीचा आदेश दिला तर आदिवासी भवनचे बांधकाम कोणी रोखलेय किंवा कोण खेळी खेळतोय, कोणते अधिकारी किंवा राजकारणी त्या खेळीत गुंतले आहेत, हे सर्व मुख्यमंत्र्यांना कळून येईल, अशी चर्चा एसटी बांधवांमध्ये सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा दोष नाही, पण त्यांनाही काहीवेळा कसरत करावी लागते, याची कल्पना समाजाच्या काही नेत्यांना आली आहे. काही अधिकारी डाव खेळतात हे चौकशी झाल्यानंतरच कळून येईल, असे एसटी बांधवांमधील काहीजणांचे म्हणणे आहे. गोविंद गावडे उटी-बंगळुरूमधून परतल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
..तर गावडे यांना आरजीचा पाठिंबा : विश्वेश नाईक
आदिवासी कल्याण खात्यामध्ये भ्रष्टाचारासंबंधी जे वक्तव्य मंत्री गोविंद गावडे यांनी केले, ते आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यासाठीच आहे. हिम्मत असेल तर गावडे यांनी हा प्रश्न विधानसभेत काढावा. आरजी पक्षाचे एकमेव आमदार त्यांना पाठिंबा देतील. गावडे यांनी भ्रष्टाचारासंबंधीचे सर्व पुरावे घेऊन दक्षता खात्याकडे तक्रार करावी. आरजी त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहील, असे आरजी पक्षाचे संस्थापक सदस्य विश्वेश नाईक यांनी सांगितले. आरजी पक्षाच्या एसटी शाखेच्यावतीने येथे पत्रकार परिषद ते बोलत होते. आरजीचे दक्षिण गोवा अध्यक्ष शैलेश नाईक, प्रेमानंद गावडे, हितेश गावकर, मनीषा वळवईकर, रुपो जल्मी आदी उपस्थित होते.
मंत्री गोविंद गावडे यांना लक्ष्य केले जातेय : 'उटा'
प्रेरणा दिन कार्यक्रमावेळी मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या भाषणावरून त्यांना लक्ष्य केले जात आहे. गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यातील काही कर्मचारी काम करत नसल्याने भवन पूर्ण होत नसल्याचे सांगितले. त्यांनी कुठेही मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही' असा दावा 'उटा' संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केला.
संघटना मंत्री गावडे यांच्या पाठीशी राहील. जर गावडे यांच्यावर काही कारवाई होत असेल, तर 'उटा' विचार करून पुढील धोरण ठरवेल' असेही संघटनेने स्पष्ट केले. 'उटा' संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी दुपारी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी अध्यक्ष वेळीप यांच्यासह उपाध्यक्ष विश्वास गावडे, उमेश गावकर, विशेष चिटणीस दुर्गादास गावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
वेळीप म्हणाले की, 'राजीव गांधी कला मंदिरात साजरा झालेला प्रेरणा दिन कार्यक्रमात सुमारे २५,००० लोक उपस्थित होते. क्रीडामंत्री गावडे यांनी त्यांच्या आदिवासी कल्याणमंत्री असल्याच्या काळात पायाभरणी केलेले आदिवासी भवन अजूनही पूर्ण होत नसल्याने निराशा व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा कुठेच उल्लेख केलेला नाही. आदिवासी कल्याण खात्यातील वरिष्ठ अधिकारी काम करत नसल्याने या भवनाचा प्रकल्प अपूर्ण राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या काळातील विकासकाम अद्याप पूर्ण झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
वेळीप म्हणाले की, 'गावडे यांनी उटा आंदोलनात सक्रिय भाग घेऊन समाजाच्या विकासासाठी काम केले आहे. गावडे यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. आम्ही त्या कार्यक्रमातले गावडे यांच्या भाषणाचा व्हिडीओही भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांना पाठवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही याविषयी खुलासा दिला आहे. उटा पक्ष मंत्री गावडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल.
दरम्यान, उपाध्यक्ष विश्वास गावडे म्हणाले, 'गोविंद गावडे यांनी अनुसूचित जमातीच्या विकासासाठी काम केले आहे. गावडे हे २०१७ ते २०२१ पर्यंत आदिवासी कल्याण मंत्री असताना समाजासाठी विविध गोष्टी, सवलती त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. समाजासाठी ते कार्यरत आहेत. त्यामुळे पक्ष मंत्री गावडे यांच्या पाठीशी उभा राहिल. जर त्यांच्यावर काही कारवाई झाली तर त्याच्याविरोधात नेमकी कोणती भूमिका घ्यायची हे ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली जाणार आहे.