शेतकरी चिंतेत अस्नोडा : मुळगाव पंचायत क्षेत्रातील मानसबागवाडा येथील पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन तलावांपैकी फक्त एकच तलाव उपसण्यात आलेला असून दुसरा अद्याप पावतो उपसण्यात आलेला नसल्यामुळे शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार पिमेकडे असलेला तलाव काही वर्षांपूर्वी गोव्यातील मिनरल फाऊंडेशनने उपसला होता. सर्व चिखल, झाडेझुडूपे तथा शेवाळ काढून टाकले होते. त्यामुळे त्या तलावाचे पाणी स्वच्छ झाले होते व त्याचवेळी लवकरच पूर्वेकडील तलाव उपसण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत त्या तलावाबाबत कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तलावात चिखलाचे साम्राज्य असून त्यासोबत कमळांची फुले वाढलेली आहेत. तसेच शेवाळाने हा तलाव पूर्णपणे व्यापलेला आहे. याच पूर्वेकडील तलावाला लागून एक ओहोळ असून त्या ओहोळाद्वारेच शेतीला पाणीपुरवठा व्हायचा. हा ओहोळ पण चिखलाने व गवताने व्यापलेला होता. मात्र तत्कालीन खाण व्यवसायिक धेंपो कंपनीने सदर ओहोळ उपसला होता; परंतु तलाव चिखलाने व्यापलेला असल्यामुळे या ओहोळात पाण्याचा अभाव असतो.दहा बारा वर्षापूर्वी येथील शेती व्यवसाय आघाडीवर होता. मात्र या काही वर्षापासून सदर व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. गेल्या १२ वर्षांपासून सदर वायंगण शेती पडीकच आहे. मुळगावातील बहुतेक युवक धेंपो कंपनीत कामाला होते; पण सध्या सर्व खाणी बंद असल्यामुळे सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे पूर्वेकडील हा तलाव त्वरीत उपसण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. (वार्ताहर)
मानसबागवाड्यावरील तलाव गाळानेभरला
By admin | Updated: May 3, 2014 14:26 IST