काणकोण : गेल्या ४ जानेवारी रोजी चावडी, काणकोण येथील रुबी रेसिडन्सी या इमारत प्रकल्पातील एक इमारत कोसळून इमारतीत विविध प्रकारचे काम करणारे ३१ कामगार मृत्यू पावले होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी पुण्याहून काँक्रिट क्रशिग क्रेन आणण्यात आली होती व तिच्या साहाय्याने इमारतीच्या भिंतीचे तुकडे करून मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून ते ढिगारे स्थानिक जमीनदार शंकर नाईक यांच्या शेतात पसरले होते व ते काढण्यासाठी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. रुबी रेसिडन्सी इमारत प्रकल्पाच्या पाठीमागे असलेला व डोंगरमाथ्यावरून वाहून येणारे पाणी समुद्राला मिळणार व मामलेदार कार्यालयाजवळील नालाही या ढिगाऱ्यामुळे बुजला होता. हा नाला बुजल्याने व सकल पातळीवर मामलेदार संकुलची इमारत असल्याने पावसात या परिसरात पाणी साचल्यास मामलेदार इमारत संकुलाला धोका असल्याची बातमी ‘दै लोकमत’ने प्रसिध्द केली होती. बुधवार ११ जून रोजी येथील मातीचे ढिगारे जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून कोकण रेल्वेच्या मुळे येथील जमिनीत घालायला सुरुवात केल्याने शंकर नाईक व शेळेर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हे ढिगारे येथेच पडून राहिल्यास शेळेर येथील घरातही पाणी भरण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)
रुबीचे ढिगारे हटविण्यास सुरुवात
By admin | Updated: June 12, 2014 01:27 IST