लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील ज्या महिला रात्रपाळीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे सरकारची जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर विविध आस्थापनांत रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आता खास वाहतूक सेवा सुरू केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कुजिरा-बांबोळी येथील धेंपो महाविद्यालयात आयोजित केलेल्या 'विकसित भारत २०४७' या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी धेंपो महाविद्यालयाच्या ट्रस्टी पल्लवी धेंपे, सांख्यिकी आणि नियोजन खात्याचे संचालक विजय सक्सेना, प्राचार्य मनोज कामत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे आपले सामूहिक ध्येय आहे. या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टाच्या अनुषंगाने गोव्याने स्वतःसाठी २०३७ पर्यंत विकसित होण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताला आर्थिक, सामाजिक, तांत्रिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून समृद्ध आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा उद्देश आहे. गोवा हे या दिशेने वेगाने वाटचाल करणारे पहिले राज्य बनावे, अशी सरकारची इच्छा आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न २०४७ पर्यंत पूर्ण करायचे असले, तरी त्याआधी १० वर्षे म्हणजे २०३७पर्यंत विकसित गोवा बनवण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी प्रत्येक गोमंतकीयाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
महिलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
महिलांची रात्रपाळीची अडचण दूर केली जाणार आहे. यासाठी महिलांना रात्री कामावरून घरी सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी खास वाहतूक सेवा सुरू करणार आहे. यामध्ये सीसीटीव्ही, जीपीएस, महिला सुरक्षारक्षक आणि तांत्रिक सुविधा असतील. सार्वजनिक आणि खासगी सेवा भागीदारीतून ही सेवा उभारण्यात येईल. औषध कंपन्यांसह इतर खासगी उद्योगांमध्ये महिला कर्मचारी वाढवण्याचे उद्दिष्ट असून, रात्री काम करणाऱ्या महिलांसाठी खास सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वेही लागू करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांना सक्षम बनवू...
धेंपो कॉलेजकडून राष्ट्रीय विकास उद्दिष्टांशी सुसंगत दृष्टी व ध्येय निश्चित करण्यात आले आहे. दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, नवकल्पना आणि समाज सहभाग यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे धंपो महाविद्यालयाच्या ट्रस्टी पल्लवी धंपे यांनी सांगितले.