Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: घरी जाता येईना, खायलाही मिळेना; रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या परप्रांतीयांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:02 IST

Coronavirus: शंभरहून अधिक परप्रांतीय मडगाव रेल्वे स्टेशनवर अडकले

मडगाव: कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व तरेची वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका परप्रांतीयांना बसू लागला आहे. बसही नाही आणि रेल्वेही नाही अशा कात्रीत सापडलेले शंभरापेक्षा अधिक परप्रांतीय मडगावच्या रेल्वे स्थानकावर अडकून पडले असून आम्ही आता घरी कधी पोहोचू हीच चिंता त्यांना सतावू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.

मागचे दोन दिवस ते येथे अडकून पडले असून रहाण्यासाठी त्यांनी रेल्वे स्थानकाचा आसरा घेतला होता. मात्र आता त्यांना रेल्वे स्थानकावरुनही पोलीस हाकलून लावू लागले आहेत त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, यातील काहीजण महाराष्ट्रातील असून काहीजण कर्नाटक राज्यातील आहेत त्याशिवाय हैदराबाद, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यासारख्या दूरच्या शहरातीलही लोक येथे अडकून पडले असून खाद्य पदार्थाची दुकानेही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांचे हे हाल पाहिले जात नसल्यामुळे काही स्थानिकांनी त्यांना जेवणही पुरविले.

या प्रवाशांपैकी हैदराबादच्या एस. जयकुमार याने प्रसार माध्यमांशी बोलताना आपली व्यथा व्यक्त केली. तो म्हणाला, मी काही कामासाठी पणजीला आलो होतो. हैदराबादला जाणा:या सर्व बसेस बंद झाल्याने कदाचित रेल्वे मिळेल या आशेने मडगावला आलो होतो. पण येथेही मी अडकून पडलो. आता घरी कसे जावे हेच मला कळत नाही असे तो म्हणाला.

आणखी एका प्रवाशाने गोव्यात अडकल्यामुळे आपण एका लॉजचा आसरा घेतला होता. मात्र लॉजही बंद झाल्यामुळे मी अशरक्ष: रस्त्यावर पडलो असे त्याने सांगितले. या प्रवाशांना गोव्यातील तियात्रिस्त तौसीफ द नावेली याने सोमवारी जेवणाची व्यवस्था केली होती. अन्य काही लोकांनीही त्यांना मदत केली.

स्थानिक नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी या अडकलेल्या प्रवाशांची व्यथा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्या कानावर घातली असता, कामत यांनी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांच्याशी संपर्क साधून या लोकांना मदत करण्याची मागणी केली. प्रशासनाने या गोष्टीत लक्ष घालण्याचे आश्र्वासन दिले असल्याचे कामत यांनी लोकमतला सांगितले.

प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था
जिल्हा प्रशासनाने या अडकलेल्या प्रवाशांची दखल घेत त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली. या लोकांना दुसरीकडे हलविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत अशी माहिती सासष्टीचे मामलेदार प्रताप गावकर यांनी दिली. याच लोकांची नव्हे तर रस्त्यावर उपाशी असलेल्या अन्य लोकांनाही प्रशासनातर्फे जेवण देण्याची व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले