लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे, हे माझे म्हणणे कायम आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतरच मी काँग्रेसकडे युती केली व ती कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करून स्थानिक पातळीवर तुम्ही नेतृत्व स्वीकारणार का?, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, काँग्रेसबद्दल आपुलकी असलेल्या जुन्या पिढीच्या या भावना आहेत. मी दूरदृष्टीने पुढे जात आहे. म्हणून कदाचित लोकांच्या या भावना असाव्यात. विलीनीकरणात वगैरे अस्तित्वही नष्ट होते. मी कोणतीही परिस्थिती समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे.
काँग्रेसवर तुमचा विश्वास आहे का?, या प्रश्नावर सरदेसाई म्हणाले की, एकेकाळी ऐनवेळी काँग्रेसने मला तिकीट डावलले; परंतु लोक माझ्यासोबत होते म्हणून मी आमदार बनू शकलो, फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूकपूर्व युती मी राहुल गांधी यांना भेटून बोलणी झाल्यानंतरच केली होती. माझा शब्द पाळला आहे.
मडगाव मतदारसंघात एन्ट्री
मडगाव पालिका निवडणुकीत ११ प्रभागांमध्ये व कुडतरीतील ३ प्रभागांत माझे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. विधानसभेसाठी दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा हा प्रवेश मानावा का? असे विचारले असता 'निश्चितच होय', असे उत्तर सरदेसाई यांनी दिले. ते म्हणाले की, माझे फातोर्डा मॉडेल यशस्वी झाले आहे. २५ सदस्यीय मडगाव पालिकेत बहुमतासाठी १३ नगरसेवक निवडून यावे लागतील. त्यामुळे मडगाव मतदारसंघातील प्रभागांमध्ये मला उमेदवार द्यावेच लागतील व ते मी देणारच आहे. मडगाव पालिकेत काँग्रेसचे काहीच अस्तित्व नसल्याचा दावा त्यांनी केला. केवळ मडगावमध्येच नव्हे, तर पुढे म्हापसा, तसेच अन्य पालिकांमध्येही गोवा फॉरवर्ड समविचारी लोकांशी बोलून पॅनल उभे करील.
उत्तरेत काँग्रेसला जिंकायचेच नव्हते
गत विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आणि भाजपला संधी मिळाली. या निवडणुकीतून विरोधकांना धडा मिळाला. लोकसभेवेळी दक्षिण गोव्याची जागा इंडिया आघाडीच्या उमेदवाराने जिंकली. उत्तर गोव्यात काँग्रेसला जिंकायचेच नव्हते, असे एकूण चित्र होते. उत्तरेत काँग्रेस अस्तित्वात तरी आहे का?, असा सवाल सरदेसाई यांनी केला.
आरजीला चूक कळेल
सरदेसाई एका प्रश्नावर म्हणाले की, आरजीने 'एकला चलो रे'चे धोरण अंगीकारले असले तरी 'एक ना, एक दिवस' या पक्षाच्या नेत्यांना आपली चूक कळून येईल. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करून क्रांती घडवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे.