लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ग्रामीण सशक्तीकरणामध्ये गोव्याच्या प्रगतीचे प्रदर्शन या विषयावर आधारित अहवालाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात प्रकाशन केले.
राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने वाढीमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. हा बदल आदर्शवत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्याने कुटुंबांमध्ये स्वयंपूर्णता आली आहे. ग्रामीण कुटुंबांच्या सक्षमीकरणात हे महत्त्वाचे ठरले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यात राज्यस्तरीय उपक्रम तसेच केंद्राकडून राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. यात ग्रामीण पातळीवर उद्योजगता स्टार्टअप प्रोग्रॅम, पंतप्रधानांचे मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायजेसचे उपक्रम आदींची अंमलबजावणी योग्यपणे याचा समावेश आहे. महिला स्वयंसहायता गटांच्या सदस्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग शोधण्यासाठी, त्यांचे आर्थिक पाठबळ वाढविणे हे त्यामागील उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ग्रामीण सशक्तीकरणासाठी सरकारने हाती घेतलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत ग्रामीण स्टार्टअप निधी वितरणात १५८ टक्के वाढ नोंद झाली आहे.
ग्रामीण संस्थांना दिल्या जाणाऱ्या निधी अंतर्गत ग्रामपातळीवर प्रकल्प हाती घेणे, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे यावर भर दिला जात आहे. यामुळे समाज कल्याणला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी गोवा लाइव्हली हुड्स फोरमच्या आशा वेर्णकर व अन्य उपस्थित होते. गोवा लाइव्हली हुड्स फोरम व मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने एकत्रितपणे हा अहवाल तयार केला आहे.