लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'विद्यार्थ्यांनी भविष्य सुरक्षित करणारे शिक्षण घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना करिअर घडवणारे शिक्षण देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केले.
साखळी रवींद्र भवन येथे पद्मिनी फाउंडेशनतर्फे विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान व गौरव सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कौशल्ये विकसित करा, राज्यात हजारो नोकऱ्या आहेत. संधी घेण्यासाठी पुढाकार घ्या. खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. सरकारीच नोकरी हवी, असा हट्ट धरू नका, असे आवाहन त्यांनी केले. आमदार प्रेमेंद्र शेट, सुलक्षणा सावंत, बाबलो मळीक, सागर फडते, गौरवी नाईक, सपना पार्सेकर, साहिमा गावडे, गोपाळ सुरलीकर, शर्मिला मडकईकर, डॉ. लक्ष्मी परब, मैथिली परब, सिद्धी प्रभू, आनंद काणेकर याच्यासह मान्यवर, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग्य मार्गदर्शनाची गरज
मुख्यमंत्री म्हणाले की, 'मानव संसाधन मंडळातर्फे नोकरी करत पुढील शिक्षण घेण्याची सुविधा आहे. आपले कौशल्य काय आहे ते ओळखा. आज पारंपरिक शिक्षण घेण्याचे दिवस संपले आहेत. उत्तम कौशल्यावर नोकरी निश्चित होते. करिअरची योग्य माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी गोंधळलेला असतो. त्यामुळे योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. साखळीत अनेक कौशल्य विकसित करणाऱ्या शिक्षण सुविधा आहेत. शंभर टक्के रोजगार संधी आहे. आम्ही साखळीत चार व्यावसायिक महाविद्यालये सुरू केली आहेत. सुविधा देण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे', असे त्यांनी सांगितले.
शिक्षणासाठी अनेक योजना
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार शिक्षणासाठी ८ ते २१ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देते. परदेशी शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. अनेक योजना आहेत. हेमंत जैस्वाल यांनीही मार्गदर्शन केले. सुलक्षणा सावंत यांनी पद्मिनी फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, करिअर मार्गदर्शन, गरजूंना निवारा, कौशल्य विकसित करण्यासाठी उपक्रम राबवत असते, असे सांगितले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पद्मिनी फाउंडेशनतर्फे शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात दर्जेदार सेवा दिल्या जातात असे सांगितले. यावेळी सिद्धी प्रभू यांनी पद्मिनी फाउंडेशन उत्तम सेवाकार्य बजावत असल्याचे सांगितले. साखळी मतदारसंघातील ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. शिक्षक व डॉक्टर्स यांचा गौरव करण्यात आला. प्रीती नाईक, विद्या खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.