वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यातील विविध भागात अडकलेल्या ४५० विदेशी पर्यटकांना मंगळवारी (दि.३१) दाबोळी विमानतळावरून दोन खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता दाबोळी विमानतळावरून ‘एअर इंडीया’ च्या खास विमानाने ३१७ फ्रेंकफट, जर्मनी येथील नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले तर संध्याकाळी ‘रोशीया एअरलाईंन्स’ च्या खास विमानाने १३३ पर्यटकांना मॉस्को, रशिया येथे पाठवण्यात आल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिली.
कोरोना विषाणूची पसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण भारतात २५ मार्च पासून २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. इतर राज्याबरोबरच गोव्यातही याचे कडक रित्या पालन केले असून दाबोळी विमानतळावरून होणारी सर्व राष्ट्रीय व अंतरराष्ट्रय विमान सेवा सद्या रद्द करण्यात आलेली आहे. सदर लॉकडाऊन मुळे गोव्यात विविध राष्ट्रातील सुमारे दोन हजार पर्यटक अडकून राहील्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी सोमवारी (दि. ३०) देऊन त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी सात खास विमाने येणार असल्याचे कळविले होते. मंगळवारी (दि. ३१) पहाटे ५.३० च्या सुमारास दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘एअर इंडीया’ च्या खास विमानातून ३१७ विदेशी पर्यटकांना फ्रेंकफट, जर्मनी येथे त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली. तसेच संध्याकाळी दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘रोशिया एअरलाईंन्स’ च्या खास विमानातून १३३ प्रवाशांना मॉस्को, रशिया येथे पाठवण्यात आले. लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकलेल्या ४५० विदेशी पर्यटकांना मंगळवारी त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असून लवकरच राहीलेल्या पर्यटकांना मायदेशी पाठवण्याकरिता खास विमाने गोव्यात येणार असल्याचे गगन मलिक यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी (दि. ३०) रात्री दाबोळी विमानतळावरून अन्य एका खास विमानातून इस्त्राईल राष्ट्रातील काही प्रवाशांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली.
२५ मार्च पासून लॉकडाऊन झाल्यानंतर अजून पर्यंत दाबोळी विमानतळावर सहा खास विमाने दाखल होऊन युनायटेड किंगडम, झेक प्रजासत्ताक, रशिया, इस्त्राईल अशा विविध राष्ट्रातील ९३० विदेश पर्यटकांना घेऊन त्यांच्या मायदेशी गेली असल्याची माहीती विमानतळ सूत्रांकडून उपलब्ध झाली. यात ५ चिमुकल्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी कळविले. सोमवारी रात्री व मंगळवारी अशा २४ तासाच्या काळात दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या तीन खास विमानातून विदेशी प्रवाशांना त्यांच्या मायदेशी पाठविल्यानंतर दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने कोरोना विषाणूची पसरण होऊ नये याकरिता विविध प्रकारच्या खबरदारी बाळगल्याचे दिसून आले. दाबोळी विमानतळ कर्मचाऱ्यांनी विमानतळ टर्मिनल इमारतीत असलेल्या सर्व वस्तूंची साफसफाई करण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने अन्य विविध पावले उचलली असे संचालक गगन मलिक यांनी माहीतीत कळविले. तसेच दाबोळी विमानतळावरून या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असताना कोरोना विषाणूची पसरण होऊ नये यासाठी विविध प्रकारची सुरक्षेची पावले उचलण्यात आलेली असल्याचे संचालक गगन मलिक यांनी माहीतीत शेवटी सांगितले.