लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात राज्यातील विविध भागांतून आलेल्या लोकांची गाऱ्हाणी ऐकली. जनता दरबारात आलेल्या विविध गावांतील लोकांना भेटून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ५०० पेक्षा जास्त अधिक विविध प्रकारच्या समस्या ऐकून घेतल्या.
मुख्यमंत्र्यांनी भेटण्यास आलेल्या लोकांचे प्रश्न समजून घेताना आपुलकीने चौकशी केली. संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न सोडविण्यासाठी विविध सूचना केल्या. मुख्यमंत्री सातत्याने लोकांच्या संपर्कात राहून जनतेच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहेत. लोकांना ज्या गोष्टींची कमतरता भासते, त्यांची पूर्तता करण्याची, समस्या सोडविण्याची सूचना त्यांनी केली.
दि. १९ मार्च रोजी डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्र्यांची सलग सहा वर्षे पूर्ण करतील. जनता दरबारातून मुख्यमंत्री शेकडो लोकांच्या समस्या समजून घेत आहेत व अनेकदा त्यावर तात्काळ निर्णयही घेत आहेत. यामुळे त्यांचा जनता दरबार दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.