मडगाव : काँग्रेसला अपशकुन करण्यासाठी रिंगणात उतरलेल्या चर्चिल आलेमाव व शालोम सार्दिन या दोन्ही ‘गेम स्पॉयलर्स’चा फारसा कुठलाही परिणाम जाणवला नाही. ४0 हजार मते घेणार, अशी दर्पोक्ती करणारे चर्चिल आलेमाव यांना केवळ ११,९४१ मते पडली, तर शालोम सार्दिन २५८५ मते घेऊ शकले. त्या मानाने ‘आप’च्या स्वाती केरकर यांनी ११,२४६ मते घेऊन आपले राजकीय पदार्पण गाजवले. भाजपासाठी गेम स्पॉयलर असलेले गोविंद गावडे हेही फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. आपण २0 हजार मते घेणार, असा दावा गावडे करीत होते. प्रत्यक्षात त्यांना ७१५२ मते मिळाली. चर्चिल आलेमाव काँग्रेसची किती मते फोडतील, याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होेते; पण राजकीय विश्लेषक त्यांना १५ हजारच्या वर मते देण्यास तयार नव्हते. राजकीय विश्लेषकांचा अंदाज खरा ठरला. चर्चिल यांना १0 हजार मते पडतील, अशी अपेक्षा होती; पण त्यांनी १,९४१ मते जास्त घेतली. एवढी कमी मते का मिळाली, असे आलेमाव यांना विचारले असता ते म्हणाले, एवढ्या कमी वेळात एवढी मते घेणे ही सोपी गोष्ट नाही. मी जिंकण्यासाठी निवडणुकीत उतरलो नव्हतो. मला फक्त काँग्रेसला धडा शिकवायचा होता. यापूर्वी हेच चर्चिल मी जेवतो किती आणि पचवतो किती, हे माझे मलाच ठावूक, असे सांगत होते. आलेमाव यांना स्वत:लाही एवढी कमी मते पडतील, अशी अपेक्षा नव्हती. चर्चिल यांना एवढी कमी मते पडल्याने संपूर्ण आलेमाव कुटुंबाची राजकीय कारकीर्द धोक्यात आल्याचे मानले जाते. या निकालानंतर काँग्रेसबरोबर असलेल्या ज्योकिम आलेमाव व वालंका आलेमाव यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही आलेमाव कुटुंबाची शेवटची राजकीय खेळी का, असे चर्चिल आलेमाव यांना विचारले असता, ते म्हणाले, केवळ मी पराभूत झालो आहे. याचा आलेमाव कुटुंबाशी काय संबंध? सध्या काँग्रेसच विस्कळीत झाली आहे. अशा वेळी काँग्रेसने आलेमाव कुटुंबाची चिंता करण्यापेक्षा स्वत:ची चिंता करावी, असे ते म्हणाले. शालोम सार्दिन तसेच गोवा सुराज पार्टीचे सावियो रॉड्रिगीस हेही फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. रॉड्रिगीस यांना केवळ ७८३ मते मिळाली. याबद्दल अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी मत व्यक्त करताना, या तथाकथित नेत्यांना आपली खरी किंमत आता कळून चुकली असेल. मतदारांना वेठीला धरले म्हणून त्याचा फायदा होत नाही, असे सरदेसाई म्हणाले. अपक्ष उमेदवार गोविंद गावडे हेही अपेक्षेप्रमाणे मते घेऊ शकले नाहीत. आपल्या मतदारांना धमकावल्यामुळे कमी मते मिळाली, असे ते म्हणाले. सावर्डे, सांगे व केपेत मला चांगली मते पडतील, अशी अपेक्षा होती; पण त्या मतदारसंघांत मतदारांची दिशाभूल केल्याने निकाल वेगळा लागला, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
चर्चिलचा बार फुसकाच
By admin | Updated: May 17, 2014 01:58 IST