पणजी : राज्यातील अभयारण्यांचा बफर झोन कमी व्हावा आणि म्हादई व नेत्रावळी अभयारण्यांमधील खनिज खाणी टप्प्याटप्प्याने बंद करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी आपण केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यासह अन्य कायदेशीर बाजूंबाबतही आपण दिल्ली भेटीवेळी पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा केली. मांडवी नदीपलीकडील चोडण अभयारण्यास यापूर्वी केंद्रीय मंत्रालयाने शंभर मीटरचा बफर झोन ठरविला आहे. तो रद्द करून शून्य मीटर बफर झोन करावा आणि काणकोणमधील खोतीगाव अभयारण्यास तीन किलोमीटरऐवजी एक किलोमीटरचा बफर झोन केला जावा, अशी मागणी आपण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. म्हादई व नेत्रावळी अभयारण्यांमध्ये ३२ गावे अडकलेली असून ती गावेही बाहेर काढायला हवीत. चोडणच्या सलीम अली पक्षी अभयारण्यास एक किलोमीटरचा बफर झोन केल्यास पणजीपर्यंत कोणताच हॉटेल व्यवसाय किंवा पर्यावरणापूरक असा उद्योगदेखील चालविता येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. खोतीगावसह अन्य अभयारण्यांसाठीही राष्ट्रीय महामार्गासारख्या सुविधा या बफर झोनच्या सीमा म्हणून मान्य करायला हव्यात. बफर झोनमधील खनिज खाणी तत्काळ बंद न करता त्या पाच ते दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद केल्या जाव्यात, अशीही मागणी केंद्रीय मंत्रालयासमोर ठेवली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
अभयारण्यांचा बफर झोन कमी होणार!
By admin | Updated: June 12, 2014 01:28 IST