पणजी : गोवा-महाराष्ट्राच्या संयुक्त तिळारी प्रकल्पावर राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धरणाचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे ठरले आहे. अस्नोडा आणि चांदेल प्रक्रिया प्रकल्प सर्वस्वी तिळारीच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने पुढील काळात बार्देस आणि पेडणे तालुक्यातील लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. तीन वर्षांत अस्नोडा प्रकल्पाला ३८९ दिवस तर चांदेल प्रकल्पाला तब्बल ६५८ दिवस पाणी मिळाले नसल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अस्नोड्याच्या ११५ एमएलडी प्रकल्पाला आणि चांदेल येथील १५ एमएलडी प्रकल्पाला तिळारीच्या कालव्यातून पाणी पुरवले जाते. एप्रिल-मे महिन्यात तर या दोन्ही पाणी प्रकल्पांची मदार ‘तिळारी’वरच असते. हणखणे, इब्रामपूर, हसापूर, कासारवर्णे भागात शेतकरी तिळारीच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी करीत आहेत. डाव्या कालव्यातून साळ, वडावल, लाटंबार्से, मेणकुरे, बोर्डे भागातही शेती, बागायतींसाठी तिळारीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. (प्रतिनिधी)
बार्देस, पेडणेत पाणीबाणी
By admin | Updated: November 23, 2015 02:22 IST