मडगाव : दाबोळी विमानतळावरील नागरी उड्डाणाच्या वेळेत नौदलाने जे निर्बंध घातले आहेत, ते शिथिल करावेत यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न केले जाणार असल्याचे संकेत दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी गुरुवारी दिले. २६ मे रोजी मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. सध्या सकाळच्यावेळी दाबोळी विमानतळावरून नागरी उड्डाणे करण्यास नौदलाने निर्बंध घातलेले आहेत. दिल्लीतून गुरुवारी गोव्यात पोचलेले सावईकर यांनी सायंकाळी आपल्या मडगाव कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या कार्यालयात जमा झाले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना नागरी उड्डाणावर घातलेल्या बंदीमुळे पर्यटकांना त्रास होत असून, याचा परिणाम गोव्यातील पर्यटकांना होण्याची शक्यता असल्यामुळेच या प्रश्नावर गंभीरतेने विचार केला जाईल, असे ते म्हणाले. या संदर्भात विमानतळ अधिकार्यांशी गोव्यात प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या प्रश्नात लक्ष घातले आहे, असे ते म्हणाले. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने या व्यवसायावर दुर्लक्ष करून चालणार नाही. या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री उभारण्यावर आपण भर देईन, असे ते म्हणाले. दाबोळी विमानतळावर जास्तीत जास्त सुविधा उभ्या राहाव्यात यासाठीही आपले प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दाबोळीवरून सकाळी विमानोड्डाण?
By admin | Updated: May 23, 2014 01:25 IST