पणजी : वीज खात्याने मान्सूनपूर्व कामांचा न केलेला निपटारा, तसेच खात्याच्या बेजबाबदारपणाचे पितळ जोरदार वार्या पावसाने पुन्हा एकदा उघडे पडले. उत्तर गोव्यातील बहुतांश भाग सोमवारी रात्री अंधारात बुडाला. अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली. वीजपुरवठा खंडित राहिला. सत्तरी, डिचोली, पेडणे, तिसवाडी व बार्देस तालुक्यांना मोठा फटका बसला. बार्देसमध्ये तर अर्धा अधिक भाग सोमवारी अंधारात राहिला. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली. वीज नसल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही व त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. काही भागांत २४ तास उलटले, तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांनी सरकारच्या नावाने ठणाणा केले. राजधानीचे उपनगर मानल्या जाणार्या पर्वरीत तब्बल १४ तास वीज गायब होती परिणामी असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पर्वरीतील रहिवाशांना सकाळी आंघोळीसाठीही पाणी न मिळाले नाही. त्यांना रजा टाकून घरी राहावे लागले. वीज गडप झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना लाही- लाही झाले. वीज नाही म्हणून पाणीही नाही, असा प्रकार अनेक ठिकाणी घडला. पर्वरीत दिवसभर लोकांना पाणी मिळाले नाही. वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंप सुरू होऊ न शकल्याने पाणी सोडता आले नाही. लोकांनी पाण्यासाठी बाटल्यांचा वापर केला. बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) दत्तात्रय बोरकर यांना विचारले असता, वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्याचे सांगून त्यांनी वीज खात्यावरच खापर फोडले. १९ मे रोजी पहिल्या पावसातही गडगडाटामुळे थिवी उपकेंद्रातून येणारी ११0 केव्हीची वाहिनी तुटल्याने वीज गायब होऊन लोकांना मोठा त्रास झाला होता. त्यानंतर पर्वरीत दोन वेळा ‘शट डाउन’ घेऊन मान्सूनपूर्व कामे करण्यात आली; परंतु त्याचाही काही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
उत्तर गोव्याचा बहुतेक भाग अंधारात
By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST