पणजी : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. अनेक प्रकरणे पोलीस, न्यायालयांत प्रलंबित आहेत. महिलांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महिला आयोगाने प्रखर भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र, महिला आयोग केवळ सुनावणी आणि समुपदेशनाच्या व्यापात गुंतला असून प्रभावहीन बनला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या गोवा समन्वयक राजश्री नगर्सेकर यांनी केला. हणजूण येथे झालेल्या पर्यटन युवती बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाला त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्यासाठी आणि महिलांच्या हितासाठी सक्षमपणे उभे राहण्यासाठी जागे व्हा, असा संदेश देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी पणजी येथील महिला आयोगाच्या कार्यालयात निवेदन सादर केले. यात महिला आयोगाला सुमोटो केस दाखल करण्याचा अधिकार असूनही गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत एकही सुमोटो तक्रार आयोगाद्वारे करण्यात आलेली नाही. आयोगाच्या अध्यक्ष विद्या शेट तानावडे या आठवड्यातील दोन दिवस मंगळवार व शुक्रवारी कार्यालयात अर्धा दिवस उपस्थित असतात. उपस्थित असलेल्या चार-पाच तासांत त्या कशा व कोणत्या प्रकारे महिलांच्या समस्या सोडवितात, हा संशोधनाचा विषय असल्याचे नगर्सेकर म्हणाल्या. महिला आयोगाच्या या संथ कामकाजाची माहिती देण्यासाठी आम्ही राज्यपाल मृदुला सिन्हा यांची मंगळवारी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयोगासारख्या पदांवर कोणत्याही पक्षाच्या बांधिलकीत नसलेल्या व्यक्तीलाच नियुक्त करावे, अशी मागणीही नसर्गेकर यांनी केली. (प्रतिनिधी)
महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ‘आप’चे आयोगास निवेदन
By admin | Updated: June 9, 2015 01:22 IST