गडचिराेली : काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी अजूनही कायम असल्यामुळे या वर्षी धार्मिक यात्रा, उर्स भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या महाशिवरात्रीच्या यात्रांना आणि उर्सला बसणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव, अरतताेंडी, खाेब्रामेंढा, सलंगटाेला, चपराळा येथे जत्रांचे आयाेजन केले जाते, तसेच सिराेंचा तालुक्यात हजरत अली हैदरशहा बाबा यांचा उर्स भरविला जातो. या यात्रांसाठी हजाराेंचा जनसमुदाय विविध भागातून एकत्रित येतो. त्यामुळे काेराेनाचा प्रसार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या यात्रा भरविण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातला आहे.
यात्रा भरविण्यास परवानगी मिळावी, म्हणून अनेक ठिकाणांचे अर्ज संबंधित तहसीलदारांकडे प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोनाच्या काळानंतर व्यवसायाला मार बसलेल्या छोट्या व्यावसायिकांनाही याचा फटका बसणार आहे.