कुरखेडा : एक कोटीहून अधिक रक्कम खर्च होऊनही येथील नवीन पाणी पुरवठा नळ योजनेचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. परिणामी नळ योजनेचे पाणी अद्यापही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू शकले नाही. या बांधकामातील संपूर्ण प्रकारणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शहरात कार्यान्वित जुनी पाणी पुरवठा नळ योजना वाढत्या लोकसंख्येला अपुरी ठरत असल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन तीन लक्ष लिटर क्षमतेच्या पाणी पुरवठा नळ योजनेच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. या अंतर्गत नव वसाहत श्रीराम नगर येथे तीन लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. मात्र चारही बाजुंनी पाण्याची टाकी गळत असल्याचे चित्र आहे. टाकी केव्हाही सभोवतालच्या लोकवस्तीवर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सती नदीच्या तिरावर मोठ्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र या विहिरीत पाण्याच्या अपेक्षित साठा होऊ शकला नाही. अपेक्षित खोलीकरण न केल्याचा आरोप नागरिकांनी करताच. विहिरीतील गाळ उपसून खोलीकरण करण्याचा असफल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विहिरीच्या आत पुन्हा लहान विहिर खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला. विहिर व टाकीचे बांधकाम अपुरे असतांनाही बिलाची पूर्ण रक्कम अदा करण्यात आली. त्यामुळे काम पूर्ण न होताच रखडून पडले. काही नवीन कंत्राटदारांनी उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एवढे करूनही जलकुंभ गळत असल्याने याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी जि. प. सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
नळ योजनेचे काम सहा वर्षांपासून रखडले
By admin | Updated: February 4, 2015 23:15 IST