अहेरीतील दसरा महोत्सव : १५ हजारांवर नागरिकांची उपस्थितीअहेरी : अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे विश्वश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज यांच्यावर अहेरी इस्टेटच्या नागरिकांनी जे प्रेम केले आणि जो विश्वास टाकला, तसाच विश्वास माझ्यावरही नागरिकांनी टाकला आहे. नागरिकांच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.मंगळवारी अहेरी येथील राजमहल परिसरात आयोजित दसरा महोत्सवात जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी राजमाता रूखमिनीदेवी, कुमार अवधेशरावबाबा, प्रवीणरावबाबा व राजघराण्यातील इतर सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव म्हणाले, नागरिकांमुळेच मी मंत्री पदावर पोहोचलो आणि विकासाची कामे सुरू आहेत. मागील दोन वर्षांच्या अनुभवातून मी बरेच काही शिकलो आहे. पुढील तीन वर्षात जनतेसाठी विकासकामे करायची आहेत. सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात व्हावा, यासाठी मी कटीबद्ध असून सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाबाबत विरोधक जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवित आहे. युवकांनी फक्त वॉटस्अॅप, फेजबुकपर्यंत सिमित न राहता, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. चांगले शिक्षण घेऊन मोठे प्रशासकीय अधिकारी होऊन गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करावी, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. अहेरीच्या आत्राम परिवाराचा दसरा देशात प्रसिद्ध असून आपल्या या संस्कृतीचे जतन आपल्या सर्वांना मिळून करायचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनता भोेळी आहे, मात्र विरोधक त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना भूलथापा देतात. मात्र मी असे होऊ देणार नाही, मी सदैव जनतेच्या पाठीशी राहणार, असे आश्वासन अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.सदर दसरा महोत्सवाला १५ हजारांवर नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान पारंपरिक आदिवासी रेला नृत्य सादर करण्यात आले. दसरा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नाविसं, भाजप कार्यकर्ते, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनिल कत्रोेजवार यांनी केले. (प्रतिनिधी)
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- अम्ब्रीशराव
By admin | Updated: October 13, 2016 02:39 IST