देसाईगंज : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेली एकही रूग्णवाहिका नसल्याने येथील रूग्णांना जुन्या भंगार रूग्णवाहिकांमधून दुसऱ्या रूग्णालयात हलवावे लागत आहे. देसाईगंज शहर व संपूर्ण तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची मदार देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयावर अवलंबून आहे. जुनी इमारत लहान असल्याने नवीन व प्रशस्त इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार देसाईगंज शहरात २०१२ साली ग्रामीण रूग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात आली. इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेली रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. या बाबीला आता दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अजूनपर्यंत या रूग्णालयाला अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली रूग्णवाहिका देण्यात आली नाही.जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णवाहिका आहेत. मात्र त्या भंगार स्थितीत आहेत. या रूग्णावाहिकांमध्ये आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नाही. रूग्णाला झोपविण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णाला प्रवाशाप्रमाणेच बसवूनच गडचिरोली किंवा नागपूर येथील रूग्णालयात भरती करावे लागते. मात्र नाईलाज असल्याने या सर्व हालअपेष्टा सहन कराव्याच लागतात. देसाईगंज रूग्णालय वगळता इतर सर्वच रूग्णालयांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याला केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र या निधीचा उपयोग आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी फारच कमी प्रमाणात केला जातो. परिणामी नागरिकांना शासकीय रूग्णालयात अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जुन्या पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सत्तेत आलेल्या नवीन सरकारमधील ज्या मंत्र्यांकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात येईल, त्यांनी अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
अद्ययावत रूग्णवाहिकेची प्रतीक्षा
By admin | Updated: December 9, 2014 22:51 IST