गडचिरोली : अपुऱ्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाले. धान शेतीसह इतर पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून फलोत्पादन व इतर शेतीपूरक जोडधंदे उभारून देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सदस्य सचिव जिल्हाधिकारी रणजीतकुमार, उपजिल्हाधिकारी महेश आव्हाड, जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, प्रमोद पिपरे, डीएचओ डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, शौचालय तसेच इंदिरा आवास योजनेचे घरकूल, विद्युत विभागामार्फत देण्यात येणारी कृषिपंप विद्युत जोडणी आदींची कामे अपूर्ण आहेत. सदर कामे गतीने विहीत वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना खा. नेते यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावा, असे निर्देश खा. नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. बैठकीला समितीचे सदस्य व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना जोडधंदा उभारून देण्याचा प्रयत्न करा : खासदारांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 01:22 IST