गडचिरोली : ३१ मे २०१३ नंतर जिल्ह्यात केलेल्या शिक्षक संवर्गातील २२० नियमबाह्य बदल्या तत्काळ रद्द करण्यात याव्यात, बोगस बदली प्रकरणास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यास तत्काळ निलंबित करण्यात यावी आदीसह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी उद्या ११ डिसेंबर गुरूवारपासून जि.प. समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय सहकार्यवाह सत्यम चकीनारप यांनी दिली. यावेळी माहिती देताना सत्यम चकीनारप व प्रमोद खांडेकर म्हणाले, गडचिरोली जि.प. च्या शिक्षण विभागामार्फत ३१ मे २०१३ नंतर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यात आर्थिक गैरव्यवहारही झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. संघटनेच्या मागणीची दखल घेऊन बोगस बदली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. या चौकशीअंती २२० बदल्या नियमबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले. बोगस बदली झालेल्या केवळ ७६ शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने नोटीस बजाविली आहे. यामध्ये जि.प.मध्ये नस्ती नसलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. बोगस बदली प्रकरणात २२० बदल्या नियमबाह्य करण्यात आल्या आहेत. या सर्व बदल्या तत्काळ रद्द करण्यात याव्या, अन्यथा संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयात दाद मागणार, असेही चकीनारप व खांडेकर यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात यापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने शिक्षकांच्या रास्त मागण्यांकडे कायम दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. १ डिसेंबर २०१४ रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र दखल न घेतल्याने बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा संघटनमंत्री सुरेश धुळसे व प्रसिध्द प्रमुख सत्यवान मेश्राम उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षकांच्या मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण
By admin | Updated: December 10, 2014 22:57 IST